कोल्हापूर : महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, निधी कुणाला द्यायचा हे आम्ही ठरवू” असे वक्तव्य केले होते. त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या गडहिंग्लज येथे जोरदार प्रत्युत्तर दिले.
“तुमच्याकडे तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचा खरा मालक आमच्याकडेच आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडली तर त्याला चोरी म्हणतात, आणि त्याचे काय होते हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे,” असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
मुख्यमंत्री हेच तिजोरीचे मालक असतात, असे सूचक विधान करत पाटील यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान हे वक्तव्य करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “विरोधक म्हणतील की चाव्या आमच्याकडे आहेत, पण मालक आमच्याकडेच आहे म्हणून विकासाची चिंता करू नका. विरोधकांकडे एक मंत्री असेल तर आमच्याकडे दोन मंत्री आहेत. महायुतीत एकमेकांवर टीका करायची नाही असा शब्द दिलाय, पण मुश्रीफांनी जर टीका केली तर मी कशी उत्तर देतो हे सर्वांना माहिती आहे.” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक प्रचारात उतरले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये आधीच कलगीतुरा रंगला आहे. आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र भाजप-राष्ट्रवादी यांच्यातील ही शाब्दिक चकमक महायुतीतील अंतर्कलह पुन्हा समोर आणणारी ठरली आहे.


