सोलापूर : आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप उसळला आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी आमदारांना गळाला लावण्यात यश मिळवले असून, यामुळे महायुतीला स्थानिक निवडणुकांत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने ही मोहीम यशस्वी झाली. दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यादरम्यान गोरे यांच्या मध्यस्थीने या माजी आमदारांशी बोलणी झाली, तर गुरुवारी रात्री ११.३० वाजता मुंबईतील फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या गुप्त बैठकीत पक्षप्रवेशावर अंतिम मंजुरी मिळाली. येत्या चार-पाच दिवसांत हे नेते भाजपमध्ये सामील होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या या बैठकीत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे माजी आमदार दिली माने, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे यांच्या दोन्ही मुलं रणजित शिंदे व विक्रम शिंदे उपस्थित होते. बबनदादा शिंदे सध्या अमेरिकेत उपचार घेत असल्याने त्यांच्या मुलांनी प्रतिनिधित्व केले. या सर्वांनी “आम्हाला तातडीने भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे” असा ठाम प्रस्ताव मांडला.
फडणवीस यांनी या प्रस्तावाला हिरवी झेंडा दाखवला, ज्यामुळे पक्षप्रवेशाची प्रक्रिया वेगवान झाली. या बैठकीत सांगोला व पंढरपूरमधील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही भाजप प्रवेशाचा मुद्दा चर्चिला गेला. राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपची सोलापूरवर एकहाती पकड
या पक्षप्रवेशांमुळे भाजपला सोलापूर जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता मिळवता येईल, असे राजकीय विश्लेषक सांगतात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचा दावा मजबूत झाला असून, महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांतही फायदा होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने सोलापूरमध्ये चार आमदार मिळवले होते, पण आता गोरे यांच्या रणनीतीने हा भाग फोडण्यात यश मिळाले आहे.
भाजपकडून जिथे पक्षाची ताकद कमी आहे, तिथे मजबूत करण्यासाठी पक्षप्रवेश केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या वतीने लढल्या जातील, पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, असे गोरे यांनी सांगितले.


