करमाळा (सोलापूर): राजकीयदृष्ट्या नेहमीच संवेदनशील मानल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर थंड झालेले राजकीय वातावरण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. निवडणूक पूर्व तयारीचा भाग म्हणून कारखान्याने प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे प्रारूप मतदारवादी सादर करण्यात आली आहे.
करमाळ्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू ठरणाऱ्या आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत यापूर्वी जून 2022 मध्ये संपली होती. करोनामुळे निवडणूक वेळेत झाली नव्हती, दरम्यान, 30 जून 2023 पर्यंत पात्र सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिला होता. निवडणुकीसाठी खर्च भरण्याबाबत कारखाना प्रशासनाला सूचित केल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी 10 लाख रुपये भरले होते. तेव्हा कारखान्याकडे 29 हजार 168 मतदार होते. या निवडणुकीसाठी 35 लाख 29 हजार 328 रुपये आवश्यक होते. मात्र, कारखान्याने उर्वरित सुमारे 25 लाखांची रकम भरण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आले होते. त्याचवेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः अनेक वर्षे बंद असलेल्या कारखान्याचा गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी उपस्थित राहिले होते. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर कारखान्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार प्रशासक मंडळावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटेआणि संजय गुटाळ कार्यरत होते. त्यांच्याकडून सर्व सभासद वर्गाचा अपेक्षाभंग झाला.
दरम्यान, भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कारखान्यामध्ये लक्ष घालून दुसरे प्रशासक मंडळ नियुक्त करून आणले होते. परंतु, त्याचाही काही उपयोग झाला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याकडून प्रादेशिक सहसंचालक यांच्या आदेशानुसार मतदारयादी पाठवण्यात आली आहे. कारखान्याकडे सध्या 405 सहकारी संस्था आणि 28 हजार 687 सभासद आहेत.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मदतीने उभारलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुढे कधीही पूर्ण कार्यक्षमतेने चालला नाही. उलट, यामध्ये राजकारण शिरले. कधी मोहिते-पाटील, तर कधी जगताप आणि बागल गटामध्ये कारखान्याच्या सत्तेसाठी अगदी टोकाचा संघर्ष झाला. अलीकडे अनेक वर्षे हा कारखाना बंद आहे. आता विधानसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर आदिनाथ साखर कारखान्याची निवडणूकही तेवढीच लक्षवेधी ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
नेत्यांची भूमिका काय असणार?
मोहिते-पाटील आणि त्यांचे समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, भाजप नेत्या रश्मी बागल, माजी आमदार जयवंत जगताप यांच्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष करून रश्मी बागल या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आदिनाथ साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी मैदानात उतरल्यास मोहिते-पाटील हे काय भूमिका घेणार, याकडे आतापासूनच करमाळा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


