सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. शेतमजुरीसाठी द्राक्ष बागेत काम करणाऱ्या पती-पत्नीसह त्यांचा अवघा ५ वर्षीय चिमुकला शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडला. मृतांचे नाव विजय राजकुमार लोंढे (वय ३०), प्रियांका विजय लोंढे (वय २८) आणि प्रज्वल विजय लोंढे (वय ५) असे असून, हे कुटुंब मूळचे पाटकूल (ता. मोहोळ) येथील रहिवासी होते. शेतमालक सुरेश शिवदास लाड यांच्या द्राक्ष बागेत मजुरी करणारे हे कुटुंब शेतातच वास्तव्य करत होते. या घटनेने कोर्टी गाव आणि परिसर हादरला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी प्रज्वल शेतात खेळत असताना शेततळ्यात पडल्याचे आई प्रियांका यांना दिसले. त्याला वाचवण्यासाठी त्या पाण्यात उतरल्या, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या. हे पाहून पती विजय यांनी मुलाला आणि पत्नीला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली, पण दुर्दैवाने तेही बुडाले. काही वेळाने घरातील इतर सदस्यांनी शेततळ्याजवळ जाऊन तिघांचे मृतदेह आढळले. स्थानिकांनी तात्काळ मृतदेह बाहेर काढले आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून, मृत्यूची अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की, पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असावी. मात्र, एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने आत्महत्या की दुर्घटना, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सखोल तपास सुरू असून, पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत.


