बीड: आज बीड रेल्वे स्थानकाचे औपचारिक लोकार्पण झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे यांसह स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थित होते. लोकार्पणानंतर अजित पवार यांनी भाषण करत बीडमधील विविध सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर भर दिला.
दरम्यान, यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘फक्त आजच्या दिवशी रेल्वेने मोफत प्रवास करता येईल. पण उद्यापासून तुम्हाला तिकीट काढून प्रवास करावा लागेल. जरा चांगल्या सवयी लावा. मी महाराष्ट्रात फिरत असतो…वेगवेगळ्या भागात जात असतो. पण तुम्ही असे चिगळल्यात की तुमचे नेते उठले की, ह्या.. हू…अरे कधी सुधारणार तुम्ही? मग मी काही बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले, असे म्हणता. जग कुठे चाललंय? जरा आत्मचिंतन करा. आपण कशामध्ये वाद घालतोय? कशासाठी समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करताय? असं म्हणत अजित पवारांनी बीडकरांना चांगलचं सुनावलं.
हेही वाचा – बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालं! बीड रेल्वे सेवेला आज हिरवा झेंडा
यावेळी अजित पवारांनी बीड रेल्वे मार्गाच्या महत्त्वावर भर दिला. 68 किलोमीटर लांबीच्या या नवीन मार्गाचे भूमिपूजन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांच्या काळात झाले होते. अजित पवार म्हणाले की, हा मार्ग फक्त दोन जिल्ह्यांना जोडणारा नाही, तर लाखो लोकांच्या स्वप्नाला जोडणारा आहे. त्यांनी सांगितले की, भविष्यात या रेल्वेसोबत विमानतळ देखील उभारण्याची योजना आहे.
हेही वाचा – मुंबई आंदोलनानंतर आता मनोज जरांगे पाटीलांनी दिला ‘चलो दिल्ली’चा नारा
तथापी, यावेळी राजकीय दबाव आला तरी विकास कामे थांबवणार नाही अशी हमी अजित पवार यांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक प्रकल्पासाठी निधी पुरवठा केला जाईल, पण पैसा योग्य मार्गाने वापरला जावा. याशिवाय, उपोषण आणि आंदोलनाद्वारे मागणी करणाऱ्यांसाठीही सरकार सज्ज आहे, पण काम व्यवस्थित करणे गरजेचे आहे. रेल्वेच्या या लोकार्पण कार्यक्रमामुळे बीडकरांसाठी शिक्षण, आरोग्य आणि वाहतूक सुविधांमध्ये मोठा बदल अपेक्षित आहे. नव्या रेल्वे मार्गामुळे आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळणार आहे.


