Bihar Nalanda Stampede: बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील दीप नगर भागात असलेल्या प्रसिद्ध शीतला माता मंदिरात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या अलोट गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत ८ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नियोजनशून्य कारभारामुळे ओढवला प्रसंग
चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने शीतला माता मंदिरात जत्रा आणि पूजेसाठी हजारो भाविक जमले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी साधी रांगेची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. दर्शन लवकर घेण्याच्या घाईत भाविकांमध्ये रेटारेटी सुरू झाली आणि एकमेकांना धक्के देण्याच्या नादात लोक एकमेकांच्या अंगावर पडले. अवघ्या काही क्षणांत या गोंधळाचे रूपांतर भीषण चेंगराचेंगरीत झाले. पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पीडित कुटुंबांना ६ लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मदत निधीतून २ लाख रुपये आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ४ लाख रुपये, अशी एकूण ६ लाख रुपये प्रति व्यक्ती आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जखमींवर मोफत आणि दर्जेदार उपचार करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पोलीस बंदोबस्तात त्रुटी?
या दुर्घटनेसाठी स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना जबाबदार धरले जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज एका दीक्षांत समारंभासाठी नालंदा दौऱ्यावर असल्याने जिल्ह्यातील मोठा पोलीस फौजफाटा तिथे तैनात होता. पोलिसांचे संपूर्ण लक्ष राष्ट्रपतींच्या सुरक्षेकडे वळल्यामुळे मंदिरातील जत्रेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जर वेळेत पुरेसा बंदोबस्त असता, तर ही जीवितहानी टाळता आली असती, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


