Delhi Bomb Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमधून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, ‘संपूर्ण देश पीडित कुटुंबियांसोबत आहे आणि या घटनेमागील कट रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही.’ भूतान दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते रात्रभर तपासात गुंतलेल्या सर्व सुरक्षा एजन्सींशी संपर्कात होते आणि आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, या कटामागील सत्य बाहेर काढण्यासाठी भारतातील सर्व संसाधनांचा वापर केला जाईल. दोषींना त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल.
पंतप्रधानांनी स्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांना संवेदना व्यक्त करत म्हटले की, संपूर्ण देश या दु:खात सहभागी आहे. जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी सुरक्षा व कायदा अंमलबजावणी यंत्रणांना निष्पक्ष, जलद आणि ठोस तपास करण्याचे निर्देश दिले असून, जबाबदारांवर शक्य तितकी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा –Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात, देशभरात पोलीस यंत्रणा सतर्क
भूतानमधील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी भारत-भूतान मैत्रीबद्दलही महत्त्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाते हे शतकानुशतकांचे आहे आणि हे संबंध काळानुसार अधिक दृढ होतील. त्यांनी जाहीर केले की भारत लवकरच गेलेफूजवळ नवी चौकी (Check Post) उभारणार आहे, ज्यामुळे पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना मिळेल.
पंतप्रधान मोदींचा हा भूतान दौरा 11 व 12 नोव्हेंबर रोजीचा असून, गेल्या 11 वर्षांतला हा त्यांचा चौथा दौरा आहे. त्यांनी यावेळी भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी भारताकडून दिलेल्या 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीचा उल्लेख करत सांगितले की, भारत आणि भूतानची प्रगती परस्परांशी जोडलेली आहे.


