ठाणे: केवळ जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्यासाठीच माझा वापर केला जाणार होता, असा गंभीर आरोप आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांनी केला. परंतु, आव्हाड यांचा फोन आला नसता, तर मी आत्महत्या केली असती, असा दावा अभिजीत पवार यांनी केला. तसेच आज पुन्हा मी घरवापसी केली आहे. आता मरेपर्यंत आव्हाड हेच माझे नेते असतील, असेही पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुंबईत दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजीत पवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार गटात प्रवेश झाला होता. मात्र, गुरुवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते पुन्हा शरद पवारांच्या गटात परत आले. माझ्यावर गुन्हा दाखल करून मला पुन्हा दोन वर्षे जेलमध्ये पाठवण्याचे कारस्थान होते. माझ्या मित्रांनादेखील पोलिसांकरवी धमक्या दिल्या जात होत्या. ईडीची धमकी दिली जात होती. त्यामुळे अस्वस्थ झालो होतो. नजीब मुल्ला मला फोन लावून देऊन इतरांकरवी धमक्या देण्याचे काम करत असल्याचा आरोपही अभिजीत पवार यांनी केला आहे. त्यामुळेच मी आव्हाड यांना न सांगता केवळ दबावापोटी अजित पवार गटात गेलो होतो.
मात्र, माझा वापर केवळ आव्हाड यांना अडकवण्यासाठी केला जाणार होता, हे लक्षात येताच मी पुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे परत आलो, असे पवार यांनी सांगितले. केवळ ब्लॅकमेलिंग करून माझ्यासह मित्रांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. तसेच इतरांच्या बाबतीतही तसाच प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. परंतु, आव्हाड यांचा फोन आला नसता तर मीसुद्धा आत्महत्या केली असती, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
अभिजीत पवार यांच्या आरोपाबाबत नजीब मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की अभिजीत पवार हे भराडीदेवीच्या दर्शनासाठी मालवणला जाणार होते. तिथे जाऊन त्यांनी देवीच्या समोर शपथ घेऊन पत्रकारांना नेमके काय घडले? त्याबाबत खरे काय ते सांगावे, असे आवाहन यांनी यावेळी बोलताना नजीब मुल्ला केले.


