मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘तुतारी’ या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या ‘पिपाणी’ या निवडणूक चिन्हामुळे पक्षाला मोठा फटका बसल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ‘पिपाणी’ हे चिन्ह कायमस्वरूपी गोठविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेर आयोगाने ती मागणी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या १९४ मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळले आहे.
या निर्णयामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ या नावांतील साम्यामुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. लोकसभेत रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर, बीड आणि सातारा या मतदारसंघांमध्ये ‘पिपाणी’ चिन्हावर लढलेल्या उमेदवारांना हजारोंच्या संख्येने मते मिळाली होती. उदाहरणार्थ, रावेर येथे एकनाथ साळुंके यांना तब्बल ४३,९५७ मते मिळाली, तर दिंडोरीत बाबू भगरे यांना १,०३,६३२ मते मिळाली होती.
हेही वाचा – बीडमधील राजकीय गणित बिघडणार? ‘हा’ बडा नेता सोडणार शरद पवारांची साथ
विधानसभा निवडणुकांमध्येही अनेक मतदारसंघांत हीच परिस्थिती दिसून आली. जिंतूर, बेलापूर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा आदी ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या ‘पिपाणी’ चिन्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. राष्ट्रवादीकडून असा दावा करण्यात आला होता की, ही मते विभागली नसती, तर पक्षाचे १९ आमदार निवडून आले असते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता ‘तुतारी’ चिन्हाशी साम्य असलेले कोणतेही चिन्ह निवडणूक यादीत राहणार नाही, आणि शरद पवार गटाला भविष्यात अशा गोंधळाचा फटका बसणार नाही.


