Devendra Fadnavis on Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रहार केला आहे. ‘स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी दोन हतबल पक्ष एकत्र आले आहेत,’ अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अक्षरश: खिल्ली उडवली. माध्यमांनी या युतीचे केलेले उदात्तीकरण पाहून त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा मिश्किल दाखला दिला.
‘रशिया-युक्रेन एकत्र आल्यासारखा मीडियाचा आव’
पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी या युतीच्या प्रसिद्धीवर उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, मी टीव्हीवर पाहत होतो, काही प्रसारमाध्यमे ही युती अशी दाखवत होती की जणू रशिया आणि युक्रेनमधील वैर संपून त्यांची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की आणि तिकडून पुतीन निघाले आहेत आणि त्यांची ऐतिहासिक भेट होत आहे, असा आभास निर्माण केला जातोय. पण वास्तव हेच आहे की, बुडणाऱ्या पक्षांना एकमेकांचा आधार घेण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.
फडणवीसांनी पुढे बोलताना म्हटलं की, मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे पाप या मंडळींनीच केले आहे. ज्यांनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला, त्यांच्यासोबत आज कोणीही यायला तयार नाही. त्यांचा इतिहास केवळ भ्रष्टाचार आणि स्वार्थाचा राहिला आहे, असा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. निवडणुका आल्या की केवळ भावनिक बोलून लोकांना भुलवण्याचे दिवस आता संपले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
‘आणखी दोन-चार पक्ष घेतले तरी महायुतीच जिंकणार’
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राजकीय समीकरणांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, मुंबईकरांनी महायुतीचा विकास डोळ्यांनी पाहिला आहे. ठाकरे बंधूंनी केवळ स्वतःसाठी नव्हे तर आणखी दोन-चार लहान पक्ष सोबत घेतले तरी मुंबईची जनता महायुतीच्या कामावरच मोहर उमटवेल. लोकांचा विश्वास आता केवळ ठोस विकासावर आहे.


