Chitra Wagh Statement: सध्या राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सुरू असून विविध पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार मोहिमा राबवत आहेत. निधी, विकासकामे आणि कल्याणकारी योजना यांची आश्वासने दिली जात असतानाच प्रचारसभांमध्ये होणारी वक्तव्ये सुद्धा खास चर्चेचा विषय ठरत आहेत. लोणावळा नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान भाजप नेत्या व आमदार चित्रा वाघ यांनी केलेले खास विधानही आता राज्यभर चर्चेत आले आहे.
भाजपच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ लोणावळ्यात आयोजित सभेत चित्रा वाघ यांनी महिलांच्या प्रभावावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात मुंग्यांसारखे फिरावे. मी नेहमी सांगते बाबाच्या नव्हे, तर बाईच्या नादी लागा. कारण घरातील निर्णय घेण्यामागे खरा अनुभव आणि शहाणपण हा बाईचाच असतो. संसाराच्या चांगल्या-वाईट गोष्टींची जाण सर्वाधिक महिलांनाच असते.’ त्या पुढे म्हणाल्या की, ‘नवरा नेता असला तरी तो घराबाहेरचा नेता असतो. पण घरातील नेता मात्र ती बाईच असते. म्हणून महिलांचा पाठिंबा मिळवला तर संपूर्ण घराचे समर्थन सहज मिळते. मोदी सरकारच्या योजनांपैकी तब्बल 35 टक्के योजना या थेट महिलांसाठी आहेत.’
प्रचार मोहिमेमध्ये महिलांना लक्ष्य करण्याचा सल्ला देताना त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, ‘घरातील महिलांपर्यंत पोहोचा. त्यांनी आपल्याला पाठींबा दिला तर आपला विजय नक्की आहे.’ याचदरम्यान चित्रा वाघ यांनी विनोदी शैलीत केलेले एक विधान विशेषतः चर्चेत आले आहे. त्या म्हणाल्या, निवडणुकांच्या काळात पार्टीचे वातावरण असते, घरी जेवण बनवू नको असे सांगितले की समजायचं, आज पार्टी आहे. पण बायकांनी मात्र नवऱ्यांच्या कानात कुजबुजायचं ‘खा कोणाचंही मटण, पण दाबा कमळालाच बटन.’ दोन तारखेपर्यंत हे सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्याला सांगायला आहे, असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.


