Solapur Politics: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे. अशाच वातावरणात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अंतर्गत तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमुळे पक्षातील जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेली चार दशके भाजपशी निष्ठा राखून काम करणारे अनंत धुम्मा यांनी थेट पक्ष नेतृत्वाकडे तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘यावेळी मला उमेदवारी मिळालीच पाहिजे. अन्यथा माझ्या बाबतीत काही अनुचित घडल्यास त्याची जबाबदारी पक्षाची असेल,’ असे विधान त्यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – सोलापूर हादरले..! सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, चार जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांसाठी भाजपकडे प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल १२०० पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येमुळे अनेक अनुभवी कार्यकर्त्यांना डावलले जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अनंत धुम्मा हे गेल्या ४० वर्षांपासून पक्षाच्या विविध उपक्रमांत सक्रिय असून यंदाच्या निवडणुकीत त्यांना संधी मिळावी, यासाठी ते ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यात त्यांनी अत्यंत भावनिक आणि टोकाची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
भावनिक प्रतिक्रिया आणि स्पष्टीकरण
धुम्मा यांनी सांगितले की, “पक्ष स्थापनेपासून मी प्रामाणिकपणे भाजपचे काम करत आलो आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. एवढे योगदान देऊनही न्याय मिळत नसेल तर कार्यकर्त्याने काय करावे?” मात्र व्हिडिओवर प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य भावनेच्या भरात झाल्याचे स्पष्ट केले.
पक्ष नेतृत्वाची भूमिका
या संपूर्ण प्रकरणावर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला उमेदवारीची अपेक्षा असते, मात्र पक्षाला अनेक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये आणि शहरातील शांतता बिघडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. एकूणच, उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेत जुने व नवे कार्यकर्ते यांचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर उभे ठाकले असून, सोलापूरच्या राजकारणात पुढील काळात घडामोडी आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


