Mumbai Police Notice to Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, मात्र यावेळी कारण थोडेसे वेगळे आहे. कारण, मनोज जरांगे यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुंबईच्या आझाद नगर पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मार्च महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जरांगे पाटलांना 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल महिन्यात जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात चौकशी पुढे नेण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तपास यंत्रणेनुसार, या चौकशीत काही नवे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वादही चांगलाच पेटलेला आहे. नुकतेच जरांगे यांनी धक्कादायक दावा करत सांगितले की, “मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, पहिला अर्ज मीच देईन.” त्यांनी प्रत्यक्ष अर्ज लिहून आपल्या सहकाऱ्याद्वारे जालन्यातील पोलीस अधीक्षकांकडे सुपूर्द करण्याचे सांगितले आहे. या अर्जात त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच गृह व न्याय विभागांचा उल्लेख केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, “जरांगे पाटील मराठा आणि ओबीसी समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे प्रत्युत्तर दिले आहे.


