पुणे: राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील प्रमुख नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी म्हटले की, हा पक्ष सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी देतो. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. तुमच्या बांधिलकीवर आणि कष्टावर हा पक्ष उभा आहे. राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुका 2 ते 3 महिन्यावर आल्या आहेत. तिथे 50 टक्के महिलांना निवडून द्यायचं आहे. त्यांना संधी दिली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात, असेही पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, हा धोरणत्मक निर्णय पक्षाने घेतलेला आहे, तो यशस्वी करण्याच काम येत्या निवडणुकीत आपल्या सर्वांना करायचे आहे. राष्ट्रवादी पक्षावर संकटं आली, फूट पडली. फूट पडेल असं कधीच वाटलं नव्हतं. काही लोक विरोधी विचारांसोबत गेली आणि ही फूट पडली, यावर मला अधिक बोलायचं नाही, जे राहिले ते विचारवादी आहेत, असं देखील शरद पवार यांनी म्हटलं.
जयंत पाटील यांनी संघटना मजबूत करण्याचे काम केले. आगामी तीन महिन्यांत अनेक महिलांना प्रवाहात आणले जाईल. हाडांच्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचेही शरद पवारांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मला 100 टक्के विश्वास आहे, येत्या निवडणुकीत चांगले चित्र पाहायला मिळेल. खासदार निलेश लंके सारखे लोक हे राष्ट्रवादीचा मौल्यवान ठेवा आहे, असे म्हणत शरद पवार यांनी लंकेचे काैतुक केले.


