ICC T20 World Cup 2026: आगामी T20 विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेश क्रिकेट संघाला या स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर केले आहे. त्यांच्या जागी आता स्कॉटलंड संघाला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येण्यास नकार देणे बांगलादेशला महागात पडले असून, आयसीसीने शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बांगलादेशने सुरक्षेचे कारण पुढे करत भारतात प्रवास करण्यास असमर्थता दर्शवली होती. आयसीसीने बीसीबीला अंतिम निर्णय घेण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता, मात्र बांगलादेशने त्याकडे दुर्लक्ष केले.
प्रोटोकॉलचे उल्लंघन
आयसीसीशी चर्चा करण्याऐवजी बांगलादेशने परस्पर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, जे नियमांचे उल्लंघन मानले गेले. बांगलादेशने या निर्णयाविरोधात ‘विवाद निवारण समिती’कडे दाद मागितली होती, परंतु तिथेही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.
स्कॉटलंडची ‘लॉटरी’ का लागली?
स्पर्धा सुरू व्हायला अवघे १५ दिवस शिल्लक असताना आयसीसीने स्कॉटलंडची निवड केली. पात्र न ठरलेल्या संघांमध्ये स्कॉटलंड आयसीसी टी-२० क्रमवारीत सर्वात वरच्या स्थानी आहे. मोठ्या संघांविरुद्ध स्कॉटलंडने अलीकडेच प्रभावी खेळी केली आहे. वेळेची कमतरता लक्षात घेता, स्कॉटलंड संघ तातडीने भारतात दाखल होण्यास तयार आहे.


