टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या सामन्यांना आजपासून सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे सुरुवातीपासून संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत राहिलेले संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या उपांत्य लढतीत भारतीय संघ इंग्लंडसमोर आव्हान उभे करुन विजेतेपद राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आयसीसी स्पर्धेचा इतिहास लक्षात घेतला, तर भारताचा हा प्रवास वेगळा राहिलेला नाही. पाणी नाकातोंडात जाऊन जीव जायला लागला की हातपाय मारायचे आणि जीव वाचवायचा अशीच काहीशी परिस्थिती भारताने प्रत्येक वेळेस अनुभवली आहे. ही स्पर्धाही वेगळी नाही.
अव्वल आठ फेरीचे सामने बघितले की हे लगेच कुणाच्याही लक्षात येईल. झिम्बाब्वेवर विजय मिळविला त्यानंतर वेस्ट इंडिजवर विजय मिळविताना चाहत्यांचा श्वास कंठाशी आणला होता. शतकापर्यंतच्या वाटचालीत मिळालेलया एका जीवदानानंतर अखेरपर्यंत संजू सॅमसन खेळपट्टीवर उभा राहिल्याने हा विजय साकार झाला. टी २० क्रिकेटमध्ये गोलंदाजाचे एखादे षटक किंवा एखाद्या फलंदाजाची खेळीच सामन्याचे चित्र पालटवत असले, तरी भारतीय संघासाठी अजून फलंदाजीची चिंता मिटलेली नाही. गोलंदाजीची चिंता नव्याने उद्भवली आहे हे देखिल नाकारुन चालणार नाही. विंडी संघ कितीही आक्रमक असला तरी त्यांना याच भारतीय गोलंदाजांनी अनेकदा रोखले आहे. पण, विश्वचषक स्पर्धेत या संघानेही प्रथम फलंदाजी करताना तब्बल दोनशेच्या जवळपास मजल मारली हे कसे विसरता येईल. विशेष म्हणेज या धावसंख्येत विंडीजकडून एकही मोठी खेळी किंवा भागीदारी झाली नाही. प्रत्येक फलंदाजांचे योगदान राहिले होते.
दुसरीकडे इंग्लंड संघाने गटसाखळीतील अपयश मोठ्या धैर्याने अव्वल आठच्या फेरीत धुवून काढले. सलग पाचव्यांदा इंग्लंड उपांत्य फेरीत खेळत आहे. अव्वल आठ फेरीत इंग्लंडने तीनही सामने जिंकले. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने अव्वल आठच्या फेरीत नक्कीच जिगरबाज खेळ केला. जोस बटलरसारखा टी २० निष्णात फलंदाज अपयशी होत असतानाही त्यांनी कधी आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला, तर आव्हान उभे करताना आश्वासक फलंदाजी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत त्यांच्यासाठी विल जॅक्स हा ट्रम्प कार्ड म्हणून समोर येत आहे. ऑफस्पिनर जॅक्सने गोलंदाजीसह फलंदाजीत चमक दाखवून आतापर्यंत सात सामन्यात चारवेळा सामन्याचा मानकरी पुरस्कार मिळविला आहे.
फिल साल्ट, टॉम बेन्डेन, ब्रूक, करन यांनी आपापल्या परीने योगदान दिले आहे. जॅक्सच्या बरोबरीने आदिल रशिदचीही फिरकी प्रभावी ठरत आहे. जोफ्रा आर्चर देखिल नवा चेंडू अनेकदा चांगल्या पद्धतीने वापरला आहे. हो दोन्ही संघ आतापर्यंत अनेकदा एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. त्यामुळे दोघांकडेही एकमेकांविषयी काही खास लपवून ठेवण्यासारखे काहीच नाही. सर्वात विशेष म्हणजे स्पर्धेच्या इतिहासात हे संघ तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येत असून, यापूर्वी दोनवेळा यांच्यातील विजेत्या संघाने पुढे जाऊन विजेतेपद मिळविले आहे. प्रथम २०२२ मध्ये इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव करत करंडक उंचावला होता, तर २०२४ मध्ये भारताने ७८ धावांनी विजय मिळवून दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले होते.
अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत सुर्यकुमार यादवच्या एका भन्नाट झेलने दक्षिण आफ्रिकेला विजेतेपदापासून दूर ठेवले होते. आता सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारताना त्यांना स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. बहुतेक संघ स्पर्धेत फिरकी गोलंदाजीवर वर्चस्व राखत असताना एकमेव दक्षिण आफ्रिका संघ या स्पर्धेत फिरकी गोलंदाजीवर अवलंबून नाही. केशव महाराज हा नाव घेण्यासारखा एकमेव फिरकी गोलंदाज त्यांच्या संघात आहे. पण, त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी आपली छाप पाडली आहे. कर्णधार एडन मार्करम याने स्वतःचा फिरकी गोलंदाज म्हणून केलेला वापर हा देखिल लक्षवेधक ठरत आहे. विशेष बाब म्हणजे मार्करम, रायन रिकल्टन, क्वींटॉन डी कॉक, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर या फलंदाजांनी आतापर्यंत आपली भूमिका चोख बजावली आहे. आवश्यकतेनुसार कॉर्बिन बॉश याने अष्टपैलूची जबाबदारी निभावली आहे.
न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा सर्वोत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर आपले विजेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी सज्ज असेल. न्यूझीलंड संघ २०१० नंतर प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे. अॅलन फिन, टीम सेफर्ट यांची वेगवान सलामी त्यानंतर रचिन रविंद्र, ग्लेन मॅक्सवेल, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनेर , मार्क चॅपमन यांची पूरक साथ यामुळे न्यूझीलंड संघ स्पर्धेत आतापर्यंत आपले आव्हान राखून आहे. मॅट हेन्री, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, काईल जेमिसन असे वेगवान गोलंदाज आपला दरारा टिकवून आहेत. सँटनेर हा स्वतः गुणी फिरकी गोलंदाज असून, त्याची कामगिरी नक्कीच संघासाठी दिलासादायक ठरली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे येथील खेळपट्ट्यांवर रचिन रविंद्रच्या फिरकीची त्यांना मोठी साथ मिळाली आहे आणि तीच ताकद आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांचे प्रमुख अस्त्र राहिल.
यंदाची विश्वचषक स्पर्धा उपखंडात होऊन देखिल केवळ भारत हा एकमेव उपखंडातील संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहचला आहे. श्रीलंका, पाकिस्तान संघांचे आव्हान अव्वल आठ फेरीत संपुष्टात आले. उपखंडात होणाऱ्या स्पर्धेत या घरच्या संघांचे आव्हान संपणे धक्कादायक असले, तरी परदेशी संघाची आगेकूच धक्कादायक नाही. परदेशी संघातील खेळाडू सातत्याने भारतात खेळत असतात आणि याचे सगळे श्रेय आयपीएलला जाते. आयपीएलमधील अनुभवामुळे परदेशातील क्रिकेटपटू येथील परिस्थिती, वातावरणाशी चांगला समरस झाला आहे. किमान टी २० सामन्यात त्यांना येथील परिस्थितीशी जुळवून घेणे फारसे कठिण जात नाही. आता ही समरसता किती रंग भरते आणि उपांत्य फेरीनंतर रविवारी कोण विजेतेपदाचे रंग उधळणार हे समजेल.


