कॅरेबियन अर्थात वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंना दैत्य का म्हणतात याची प्रचिती मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज नव्याने आली. फ्रँक वॉरेल, विक्स, वॉलकॉट, गॅरी सोबर्स यांच्यापासून सुरु झालेली ही यादी क्लाईव्ह लॉईड, व्हिव रिचर्ड्स, गार्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स, रिची रिचर्डसन, ब्रायन लारा, ख्रिस गेल इथपर्यंत मोठी होती. मात्र, एक काळ असा आला की क्रिकेटला हवीहवीशी वाटणारी कॅरेबियन शैली काहीशी खंडित झाली होती. निकोलस पूरन, आंद्रे रसेल असे तारे अधून मधून चमकत होते. पुन्हा कुठे तरी ती शैली हरवली होती. देशातील आर्थिक संकट, क्रिकेट मंडळाची आर्थिक कुंचबणा, पुरेशा निधी अभावी केवळ पैसा कमाविण्यासाठी विंडीज खेळाडूंनी स्विकारलेला विविध फ्रँचाईजी लीगचा मार्ग यामुळे कॅरेबियन भूमितील क्रिकेट संपल्यासारखे वाटत होते. देशासाठी खेळण्याकरता अनेक खेळाडू तयार नव्हते. त्यामुळे विंडीज क्रिकेट मंडळासमोर अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे दिव्य उभे राहात होते.
उपलब्ध परिस्थितीत आणि आहे त्या खेळाडूंमध्ये खेळणे त्यांनी स्विकारले. मुळात कॅरेबियनची जीवनशैलीच अशी आहे. जे आहे त्याचा सामना करायचा आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात मजेत घालवायचा. आपल्याकडे हे नाही म्हणून रडत बसायचे नाही. आवश्यक तेवढे कमवायचे आणि कधी बियर, कधी रमचे घुटके रिचवत दिवस घालवायचा. मस्त कॅलिस्पो (कॅरेबियनचे लोकप्रिय संगीत) धून ऐकत धुंद व्हायचे. पण, त्यांच्या चेहऱ्यावर कधीच चिंता दाखवत नाही. हीच शैली मग या क्रिकेटपटूंनी मैदानावर दाखवली तर काही वावगे वाटत नव्हते. मैदानावर उतरायचे येणारा प्रत्येक चेंडू मारायचा आणि गोलंदाजी करताना जीवतोडून वेगाने चेंडू टाकायचा. हे सगळे करताना नशीबाने साथ दिली तर विजयाची चव चाखायची. अशा बेदरकार खेळाने कधी हाताशी आलेला विजय गमावला तर त्याचं दुःख करत बसायचं नाही. नव्या सामन्याचा विचार करायचा. हे असे कॅरेबियन आणि कॅरेबियन क्रिकेटपटू. हार जीत कशाची ना खंत ना खेद. त्यामुळेच क्रिकेट विश्वात त्यांची चर्चा कायम होत राहणार.
विक्स, वॉलकॉट, वॉरेल. लॉईड, रिचर्ड्स यांच्या काळात या फटकेबाजीला नजाकत होती. क्रिकेटच्या पुस्तकातील फटक्यांची जोड होती. ख्रिस गेल आल्यापासून या शैलीला राक्षसी ताकद आली. गोलंदाजांचा कर्दनकाळ, दैत्य अशा उपमा त्याला मिळाल्या. तो चेंडू फटकावयाला लागला की चेंडूही कधी तरी म्हणले अरे बाबा हळू, मला वेदना होतायंत इतकी राक्षसी ताकद त्या फटक्यात होती. कधी कधी तर त्या चेंडूची दोन शकले होतील की काय अशी भिती वाटायची. तीच आठवण आज झिम्बाब्वेविरुद्धचा सामना बघताना शिमरन हेटमायर, रोवमॅन पॉवेल, रुदरफोर्ड, शेफर्ड, होल्डर यांनी करुन दिली. गोलंदाजाला चेंडू टाकायचा इतकेच काम होते. बाकी काम या फलंदाजांच्या बॅटनी केले. चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटला की टप्पा पडला तर मैदानाला स्पर्श करायचा. एरवी सामन्यात चेंडू हवेत भिरभिरत होता. चेंडूला क्षेत्ररक्षकांपेक्षा प्रेक्षकांनीच अधिक स्पर्श केला. षटकारामागून षटकार, चौकारामागून चौकार झडत गेले. त्या प्रत्येक फटक्याला विंडीजचा विजय लिहिला जात होता आणि इकडे भारताच्या मनातील धडकी वाढत होती.
विंडीजच्या आजच्या विजयाने भारतापुढील समीकरण अधिक कठिण होणार आहे. भारताला उर्वरित दोन्ही सामन्यात नुसते विजय नव्हे, तर निव्वळ धावगती वाढवावी लागणार आहे. भारताची सध्याची निव्वळ धावगती उणे ३.८ आहे, तर वेस्ट इंडिजची अधिक ५.६ आणि दक्षिण आफ्रिकेची अधिक ३.८ अशी आहे. त्यामुळे आता दोन्ही सामने जिंकण्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेने त्यांचे सगळे सामने जिंकणे देखिल भारतासाठी आवश्यक असेल. योगायोग म्हणजे २६ तारखेला दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज आणि भारत वि. झिम्बाब्वे असे दोन्ही सामने होणार आहेत. तेव्हा दक्षिण आफ्रिका जिंकेल यासाठी चाहते प्रार्थना करतील आणि खेळाडू झिम्बाब्वेला चारीमुंड्या चीत करतील. पण, भारताला आधी झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली तर ६० हून अधिक धावांनी विजय आवश्यक असेल आणि आव्हानाचा पाठलाग केला तेर झिम्बाब्वेचे आव्हान ११ षटकांत पार करावे लागेल तेव्हा आपली निव्वळ धावगती अधिक होईल आणि मग अखेरच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यावर भारताला लक्ष केंद्रित करावे लागेल. यासाठी दक्षिण आफ्रिकेने सगळे सामने जिंकणे आवश्यक असेल. म्हणूनच विंडीजच्या या एका विजयाने भारतासह त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनाची धडधड वाढवली आहे.


