आयसीसी टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता निर्णायक वळणावर आजपासून सुरु होईल. पण, हे निर्णायक वळण पुन्हा एकदा चर्चेचे कारण ठरले आहे. गट साखळी स्पर्धेत असलेल्या चार गटातील प्रत्येक अव्वल संघ एका गटात आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघ एका गटात आले आहेत. हा निव्वळ योगायोग असू शकतो. पण, साखळी सामने सुरु होण्यापूर्वीच आयसीसीने आपले उखळ पांढरे करण्याच्या दृष्टिने बाद फेरीचे संघ आणि त्यांचे सामने देखिल निश्चित केले. आयसीसीच्या टी २० क्रमवारीनुसार आणि गटातील संभाव्य निकाल गृहित धरुन त्यांनी विश्वचषक बाद फेरीची मानांकने निश्चित केली. कसोटी, एकदिवसीय, टी २० आणि इंग्लंडमध्ये बारसे धरु लागलेले हॅंड्रेड क्रिकेट अशी व्याप्ती वाढलेल्या या खेळाचे नियंत्रण करणाऱ्या आयसीसी या शिखर संघटनेला खेळात कुणालाही गृहित धरायचं नसते हे लक्षात येऊ नये म्हणजे जरा नवलंच म्हणावं लागेल.
आयसीसीच्या या पूर्व मानांकनानुसार आयसीसीने एक्स आणि वाय असे दोन बाद फेरीचे गट केले. यात एक्स मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघांना पहिली चार मानांकने दिली, तर वाय गटात इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना पहिली चार मानांकने दिली. हे सगळे त्यांनीच ठरवले, ते कसं याला काहीही आधार नाही. आम्ही म्हणतो हे असं..म्हणजे हे अस्सच..अशी आयसीसीची भूमिका असते. संघांना गृहित धरणं आणि त्यांची मैदानावरची कामगिरी यात खूप मोठा फरक असतो हे आयसीसी विसरुनच गेले. हीच चूक त्यांच्या अंगाशी आली. ऑस्ट्रेलिया संघाला दुसरे मानांकन दिले आणि तोच संघ बाद फेरी गाठू शकला नाही. त्यांच्या जागी झिम्बाब्वे संघ आला. दुसरं असं झालं, एक्स गटात साखळीमधील अ, ब, क, ड गटात अग्रस्थान मिळविलेले संघच एकत्र आले. त्यामुळे सगळी विचित्र परिस्थिती होऊन बसली. विजय मिळविणाऱ्या संघांना कुठलाच फायदा झाला नाही. साखळीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघांतच या लढती ठरल्या. त्यांना एकही सोपा किंवा सहज सामना मिळाला नाही. आता बाकी संघ मनातल्या मनात आणि मैदानाबाहेर क्रिकेट तज्ज्ञ या पूर्व मानांकन पद्धतीवर खडे फोडू लागले आहेत.
या पूर्व मानांकन पद्धती मागचे आयसीसीचे धोरण आपण शेवटी पाहू. पण, प्रथम यामुळे स्पर्धेतील रंगत कशी कमी झाली हे पाहू. बाद फेरीचे संघ आणि सामने आयसीसीने आधीच ठरवल्यामुळे गटात पहिला कोण, दुसरा कोण येणार यातील चुरसच संपली. त्यामुळे साखळीतील एखाद दुसरा सामना वगळला, तर बाकी सामने हे लुटुपुटूचे ठरले. अमेरिका, नेदरलॅण्ड्स, स्कॉटलंड, ओमान, इटली असे अनेक संघ मग जीव तोडून कशाला खेळतील. त्यांनी देखिल पात्र ठरलो म्हणून खेळलो अशा पद्धतीने या स्पर्धेकडे पाहिले असे म्हणायला वाव आहे. मानांकन निश्चितीचा सर्वात मोठा फटका श्रीलंका संघाला बसला यात शंका नाही. कारण, श्रीलंका संघ एकतर या स्पर्धेचे सह आयोजक आहे. त्यांना वाय गटात स्थान मिळाले. त्यामुळे आता त्यांना बाद फेरीचे काही सामने यजमान असूनही भारतात खेळावे लागणार आहेत.
हे सगळे बघितले की आयसीसी सर्कशीमधील रिंगमास्टरसारखी वाटते. क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांचा वापर ते फक्त व्यावसायिक फायद्यासाठीच करतात असे वाटते. आज इकडे..आज तिकडे…त्या संघाशी खेळायचे असे आयसीसीच ठरवले. केवळ आणि केवळ व्यावसायिक फायद्यासाठी आणि नियोजनासाठी आयसीसी असा पद्धतीने विश्वचषक सारख्या स्पर्धेत पूर्व मानांकन पद्धतीचा अवलंब करत असले, तरी त्यामुळे खेळातील आत्मा धोक्यात येतोयं हे त्यांना समजायला हवं.
अशी पद्धती निवडण्यामागची आयसीसीची भूमिका आता सांगतो. स्पर्धेतील सामने भारत आणि श्रीलंकेत होणार असल्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या संघांचे सामने कोठे होतील हे आधी कळावे आणि त्या पद्धतीने प्रवासाचे बेत आखता यावे यासाठी आम्ही आधीच बाद फेरीचे सामने निश्चित केले असे आयसीसी म्हणते. अरे, अमूक एक चाहता अमूक एका संघाचा चाहता असेल, तर तो त्याचा सामना पाहण्यासाठी कुठेही जायला तयार आहे ना. हे चाहत्यांना देखिल गृहित धरण्यासारखे झाले. अर्थात, आयसीसीचे हे सांगणे केवळ लांगुलचालन आहे. पूर्व मानांकन पद्धतीनुसार आधीच सामने ठरवणे या मागे आयसीसीचा फक्त व्यावसायिक हेतूच आहे. असे करुन ते चाहत्यांची नाही, तर त्यांच्या प्रसारण कंपनी आणि सामन्यातून मिळणाऱ्या महसूलाची काळजी करत आहे. यासाठी भारत आणि पाकिस्तान सामन्याचे उदाहरण घेऊ. बाद फेरीत भारत पाकिस्तान सामना निश्चित केला, की प्रसारण कंपनीला सामन्याची वेळ, जाहिरातीचे रेट कार्ड ठरवणे फायद्याचे होते. आता कळलं, का पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यावर पहिल्याच लेखात मी काळजी करु नका हा सामना काही केल्या होणार असे का म्हटले होते ते. उगाच नाही पाकिस्तानने बहिष्काराचा आव आणला आणि आयसीसीने तो ताणून धरला. या ताणाताणीत प्रसारण कंपन्या, हॉटेल, विमान कंपन्या सगळ्यांचेच उखळ पांढरे झाले. ऐनवेळी हा सामना होणार म्हटल्यावर लगेच विमान कंपन्या, हॉटेल्स यांचे भाव गगनाला भिडले होते.
पूर्वी हे असे नव्हते. पूर्वी साखळी फेरीतील पहिल्या दोन गटातील अव्वल आणि तिसऱ्या, चौथ्या गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ अव्वल आठ फेरीत एकत्र येत होते. दुसऱ्या गटात पहिल्या दोन गटातील दुसऱ्या आणि अन्य दोन गटातील अव्वल संघ एकत्र येत होते. त्यामुळे एक निकोप स्पर्धा बघायला मिळत होती. आता ही निकोप स्पर्धाच या पूर्व मानांकन पद्धतीने संपुष्टात आली आहे. फुटबॉलची देखिल विश्वचषक स्पर्धा होते. तेथे तर सहभागी संघांची संख्या या वेळी वाढून ४८ झाली आहे. त्यांचे बारा गट पाडण्यात आले आहेत. पण, बाद फेरीचे सामने आधीच ठरवण्यात आलेले नाहीत. ते गटवारीनुसार ठरतात. त्यामुळेच हा खेळ अजूनही ‘ब्युटीफूल गेम’ म्हणून ओळख टिकून आहे.


