Rohit Arya Encounter: मुंबईतील पवई परिसरातील आरके स्टुडिओत झालेल्या मुलांच्या ओलीस प्रकरणानंतर झालेल्या रोहित आर्य एन्काउंटरच्या तपासाला आता नवं वळण लागलं आहे. या प्रकरणात माजी मंत्री दीपक केसरकर यांचा उल्लेख समोर आल्याने, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांच्या जबाबाची तयारी सुरू केली आहे. तपासात समोर आलं आहे की, घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून रोहित आर्यशी संवाद साधण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी त्यावेळी संवाद साधण्यास नकार दिला होता. त्यामुळे या घटनेपूर्वी काय बोलणे झाले किंवा कोणते प्रयत्न झाले, हे तपासण्यासाठी लवकरच पोलिस त्यांचा औपचारिक जबाब नोंदवणार आहेत.
दरम्यान, रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणावर न्यायालयीन स्तरावरही हालचाली वेगाने सुरू आहेत. वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, पोलिसांनी बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप केला आहे. याचिकेत त्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून तपास सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याची मागणी, तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट घेण्याची विनंती केली आहे. न्यायालय या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून, पुढील काही दिवसांत तपासाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.
‘लेट्स चेंज’ उपक्रम पुन्हा चर्चेत
रोहित आर्यने शिक्षण विभागासाठी राबवलेला ‘लेट्स चेंज’ हा उपक्रमही पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकल्पातील सुमारे 2 कोटींची थकबाकी असल्यामुळे, तो गेल्या काही महिन्यांपासून देय रकमेच्या मागणीसाठी प्रयत्नशील होता. त्याने आंदोलन आणि उपोषणाचाही मार्ग अवलंबला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. सोशल मीडियावर रोहित आर्यचे जुने फोटो पुन्हा व्हायरल झाले आहेत. यात तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत एका कार्यक्रमात व्यासपीठावर दिसत आहे.
केसरकर यांचे जुने ट्विट चर्चेत
23 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या ट्विटमध्ये दीपक केसरकर यांनी लिहिलं होतं की, शालेय शिक्षण विभागाच्या ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता. या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांमार्फत समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. सध्या या प्रकरणाच्या तपासाचा फोकस केसरकर यांच्या भूमिकेवर केंद्रित झाला आहे, आणि गुन्हे शाखा त्यांच्या जबाबानंतर पुढील दिशा निश्चित करणार आहे.


