Ujwala Thite Appeal Dismissed: अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाचा अखेर निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी आपला उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर सोलापूर सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अपीलावर आज निकाल देण्यात आला. दोन्ही बाजूंचे सुमारे चार तास युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने थिटे यांचे अपील फेटाळले, त्यामुळे प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवड कायम राहणार आहे.
थिटे यांच्या बाजूने अर्जावरील सही खोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, यावर सरकारी बाजूने प्रतिवाद करताना, जर खरोखरच सही खोडण्यात आली असेल तर त्याबाबत ताबडतोब पोलिस तक्रार दाखल का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. न्यायालयानेही हा मुद्दा विचारात घेत थिटे यांचे अपील ग्राह्य धरले नाही.
चार तासांच्या सुनावणीनंतर निकाल
जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांच्या न्यायालयात उज्ज्वला थिटे, प्राजक्ता पाटील आणि सरकारी बाजूने तीनही वकिलांचे युक्तिवाद आज सकाळपासून सुरू होते. दीर्घ सुनावणी संपल्यानंतर दुपारी न्यायालयाने निकाल देत प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीला अधोरेखित केले. थिटे यांच्या वतीने वकील दत्तात्रय घोडके यांनी युक्तिवाद करताना निवडणूक अर्ज दाखल करताना आलेल्या अडचणी आणि निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या कृतींचा तपशील न्यायालयासमोर मांडला. त्यांनी प्रशासनानेच सही गायब केल्याचा दावा केला. जवळपास दीड तास चाललेल्या या सविस्तर युक्तिवादनंतर सरकारी वकिलांनी प्रतिउत्तर दिले.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज छाननीत बाद; अनगर नगराध्यक्षपदासाठी BJP चा मार्ग मोकळा
सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी स्पष्ट केले की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व कामकाज आयोगाच्या नियमांप्रमाणे केले आहे. तक्रार असेल तर निवडणूक आयोगाकडे का धाव घेतली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच थिटे या राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याने पक्षानेही यात कोणतीही भूमिका घेतली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


