मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘कॅश बॉम्ब’ टाकला आहे. पैशांच्या बंडलसह तीन व्हिडीओ पोस्ट करून त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, शेतकरी कर्जमाफीला पैसा नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपला टॅग केले आहे. या व्हिडीओमुळे राजकीय वातावरण तापले असून, अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
दानवे यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पैशांचा बंडल मोजताना आणि हाताळताना दिसणारी व्यक्ती दाखवली असून, त्यांनी लिहिले की, “या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या बंडलसह काय करत आहेत?”
या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती शिवसेना (शिंदे गट) चे आमदार महेंद्र दळवी यांच्यासारखी दिसत असल्याचे सांगितले जात आहे. दानवे यांनी या व्हिडीओद्वारे सरकारला अनेक प्रश्न विचारले असून, उत्तर देण्याची मागणी केली आहे. व्हिडीओत आमदार पैशांच्या बंडल हाताळणाऱ्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहेत.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025
या व्हिडीओ प्रकरणाने राजकीय घमासान सुरू झाले असून, महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया देत दानवे यांना थेट चॅलेंज दिले आहे. दळवी म्हणाले, “माझं नाव समोर आलं तर मी राजीनामा देईन. दानवेंनी पूर्ण व्हिडीओ दाखवावा आणि पुरावे सादर करावेत. अंबादास दानवेंची लायकी काय आहे, सर्वांना माहीत आहे. असं काही करून कुणाला ब्लॅकमेल करणं त्यांना शोभत नाही.” दळवी यांनी व्हिडीओत दिसणारी व्यक्ती मी नसल्याचे स्पष्ट केले असून, दानवे यांना संपूर्ण व्हिडीओ प्रसिद्ध करण्याची विनंती केली आहे.
हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीचे नेते सरकारला धारेवर धरणार आहेत. दानवे यांच्या या हल्ल्यामुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली असून, सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत असली तरी राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.


