Anna Hazare On Tapovan: नाशिकमधील तपोवन परिसरातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून झाडांना कुऱ्हाड चालवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, हजारे यांनी “कुंभमेळा समाज आणि राष्ट्रासाठी महत्वाचा असला, तरी हिरवाईची कत्तल कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही,” असे स्पष्टपणे सांगितले. अनेक दिवसांपासून पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि कलाविश्वातील काही व्यक्ती या ठिकाणी आंदोलन करत असल्याने हा मुद्दा राज्यभर गाजतो आहे. अण्णा हजारे यांनी म्हटले की, झाडे मानवांसोबत वन्यजीवांचेही जीवन वाचवतात. त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीत फक्त छोटी झाडे हलवण्याचा विचार करता येईल, मात्र मोठी, जुनी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाची झाडे तोडणे टाळावे. त्यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी वेग आला आहे.
हजारे उपोषणाला सज्ज; मुख्यमंत्रीांना पत्र
अण्णा हजारे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे. त्यांनी 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धीतील यादव बाबा मंदिरात उपोषणाला बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारकडून लोकायुक्त विधेयक लांबणीवर टाकले जात असल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.
तपोवनातील प्रकल्पावर मोठा वाद
दरम्यान, कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून तपोवनमध्ये उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पावरून मोठा वादंग निर्माण झाले आहे. पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे की या प्रकल्पासाठी 300 पेक्षा जास्त प्रौढ झाडे कापण्यात आली असून, यामुळे परिसरातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येईल. महापालिकेने मात्र आपली बाजू मांडताना 447 झाडांपैकी फक्त मंजूर 300 झाडांची तोड केल्याचे आणि उर्वरित झाडे वाचवल्याचे सांगितले आहे. तरीही नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये असंतोष कायम आहे.


