Uddhav Thackeray: नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र प्रहार केला. पत्रकार परिषदेत त्यांनी विदर्भातील प्रश्न, अतिवृष्टीतील नुकसानभरपाई, हिंदुत्व आणि भाजप नेत्यांच्या आरोपांवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशन अर्ध्यावर आलं असतानाही विदर्भासाठी ठोस घोषणा झाल्या नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, परंतु सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे पुढे काय झाले हे जनतेला कळलेच नाही, असे ते म्हणाले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्राच्या मदतीसाठी प्रस्तावच पाठवला नव्हता, असा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर, घाईगडबडीत प्रस्ताव पाठवून जनता दिशाभूल केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. हा प्रस्ताव किती रकमेचा आहे आणि कोणाला मदत मिळणार आहे, हे सरकारने सभागृहात स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
फडणवीसांच्या ट्विटला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत “कोण होतास तू, काय झालास तू?” असा हल्ला चढवला. यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हा प्रश्न आम्ही त्यांनाच विचारायला हवा. भ्रष्टाचारात नाव असलेले अनेक जण आज त्यांच्या पाठीशी उभे आहेत. पांघरून मंत्री आणि पांघरून खाते त्यांनी तयार केले आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही नाही.”
अमित शहा मला हिंदुत्व शिकवू नये – ठाकरे
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपने केलेल्या टीकेला ठाकरे यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपचे ‘वंदे मातरम’ हे ‘वन डे मातरम’ झाले आहे. देशाच्या वेदना त्यांना दिसत नाहीत. माझ्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अमित शहा यांनी आधी त्यांच्या मंत्रिमंडळातील गोमांस खाण्याची कबुली देणारे मंत्री पाहावेत. किरेन रिजीजू यांनी उघडपणे त्याबद्दल बोलले होते. मग माझ्यावर बोट कसे उठवता? असा सवाल त्यांनी केला.
पालघर साधू हत्याकांडावरून पुन्हा टीका
मी मुख्यमंत्री असताना साधू हत्याकांडाच्या आरोपीला भाजपनं पक्षात घेतलं. तेव्हा भाजपचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? अशा गोष्टी पाहायच्या आधी आणि मग माझ्यावर आरोप करायचे, असेही ते म्हणाले. मंदिरात दिवा लावला पाहिजे हीच आमची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


