पुणे: एकलहरे (मंचर) ता. आंबेगाव गावच्या हद्दीत पुणे–नाशिक महामार्गावर सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या एसटी बसचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी पहाटे 5:15 वाजता घडली असून या अपघातात 20 विद्यार्थी व 5 शिक्षक जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर जि. अहिल्यानगर येथिल सह्याद्री कॉलेजच्या एकूण चार एसटी गाड्या कोकण सहल करून संगमनेरकडे परतत होत्या. अकोले आगाराची एसटी एकलहरे येथे असलेल्या गतिरोधकाची अचानक जाणीव होताच वेग कमी करण्यात आला. मागून भरधाव आलेली दुसरी एसटी पुढील बसला जोरात धडकली.
या धडकेत मागील एसटीच्या पुढील भागाच्या सर्व काचा फुटल्या असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळी अनेक विद्यार्थी आणि शिक्षक झोपेतच असल्याने अचानक झालेल्या धडकेने गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर एकलहरे परिसरातील हॉटेल व्यावसायिक, आणि ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थी यांना मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत योग्य उपचार करण्यात आले. सध्या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून सर्वांना सुरक्षितपणे संगमनेर येथे रवाना केले असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.
दरम्यान अपघाताची माहिती कळताच मंचर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक मोहम्मद सय्यद व रुग्णवाहिका चालक अमित काटे यांनी तत्काळपणे दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून सर्व जखमींना मंचर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती समजली असता मंचर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुहास बाणखेले, अरविंद वळसे पाटील, पूजा वळसे पाटील, राहुल बाणखेले यांनी रुग्णालयात दाखल होऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली व आवश्यक मदत केली. तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीयसहाय्यक रामदास वळसे पाटील, विजय थोरात यांनी मंचर जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांशी संपर्क साधत सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करत त्यांच्यावर योग्य ते उपचार करणे बाबत सूचना दिल्या.
जखमी शिक्षक, जखमी विद्यार्थी
भारती दळवी (५७),रूपाली सुपेकर (४९)गणेश गुंजाळ (५३)संतोष थोरात (४३)गणपत जोंधळे (५४) अजय पवार (१८)प्रणव परदेशी (१६)अनुष्का कोरडे (१६)सार्थक अरगडे (१७) संजना कचेरीया (१७)अंकिता दिघे (१७) गणराज बांगर (१६) पूजा मुसळे (१६)दिव्या अरगडे (१६) भक्ती चितळे (१६)श्वेता सूर्यवंशी (१६)ईश्वरी कोकणे (१६) श्वेता अभंग (१७)ईश्वरी करपे (१६)वर्षा राठोड (१८) प्रीती खरात (१६)पुनम शिंदे (१६)प्रांशू तिवारी (१६)राहुल तळपे (१६)समाधान कांदळकर
एसटी महामंडळाची तातडीची मदत
“राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सर्व २५ जखमींना प्रत्येकी १,००० रुपयांची, अशा एकूण २५,००० रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. जखमी सुरक्षित असून त्यांना संगमनेर येथे सोडण्याची व्यवस्था मंचर आगाराच्या दोन एसटी बसद्वारे करण्यात आली.— वसंत अरगडे, आगार प्रमुख, मंचर


