Chandrapur News: देशात ‘विकसित भारत’ आणि उज्ज्वल उद्याचे चित्र रंगवले जात असताना, विदर्भातील वास्तव मात्र अजूनही अंगावर काटा आणणारे आहे. स्वातंत्र्यानंतर दशकानुदशके दुर्लक्षित राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात गरिबी आणि कर्जबाजारीपणाने शेतकऱ्यांना कुठल्या टोकाला नेऊन सोडले आहे, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. कर्ज फेडण्यासाठी एका तरुण शेतकऱ्याला अक्षरशः स्वतःच्या शरीरावर सौदा करावा लागल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात राहणारा रोशन कुडे या शेतकऱ्याने खाजगी सावकाराकडून होणाऱ्या छळामुळे आपली किडनी विकावी लागल्याचा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशनने उपजीविकेसाठी दुग्धव्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज व्याजाने घेतले होते. मात्र दुर्दैवाने त्याची जनावरे दगावल्याने व्यवसाय कोलमडला आणि कर्जफेड करणे त्याला शक्य झाले नाही.
सावकाराचा शेतकऱ्यावर दबाव
कर्ज थकल्याने सावकाराचा दबाव वाढत गेला. व्याजावर व्याज चढत गेले आणि देणी दिवसेंदिवस वाढतच राहिली. या परिस्थितीत सावकाराने पैसे मिळवण्यासाठी रोशनला किडनी विकण्याचा सल्ला दिला. सावकाराच्या सांगण्यावरून रोशन आधी कोलकात्याला गेला, त्यानंतर त्याला कंबोडियात नेण्यात आले आणि तेथे त्याने सुमारे आठ लाख रुपयांना आपली किडनी विकल्याचा दावा केला आहे. या साऱ्या प्रकारामागे सावकारच जबाबदार असल्याचा आरोप करत रोशन कुडे यांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना समोर येताच राज्यभरात संतापाची लाट उसळली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी स्वतःचे अवयव विकण्यापर्यंत पोहोचतो, ही बाब राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता या प्रकरणात राज्य सरकार, प्रशासन आणि कृषी विभाग किती तत्परतेने पावले उचलतात आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


