Municipal Elections: राज्यातील महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असला, तरी राजकीय मैदानात उतरणाऱ्या इच्छुकांमध्ये उत्साहापेक्षा अस्वस्थताच अधिक दिसून येत आहे. युती होणार की स्वतंत्र लढत, शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली गुप्त वाटाघाटी, पक्षांतरासाठीची धावपळ आणि उमेदवारीसाठीची चुरस या सगळ्यांमुळे अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत बहुतेक महापालिका क्षेत्रांत संभ्रमाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. या साऱ्या गोंधळात प्रचारासाठी मिळणारा कालावधीही अत्यंत मर्यादित असणार आहे. अवघे बारा दिवस हाताशी असल्याने प्रत्येक पक्ष आणि उमेदवाराला टी-२० क्रिकेटमधील पॉवरप्लेसारखी आक्रमक आणि झपाट्याने चालणारी प्रचार रणनिती आखावी लागणार आहे.
विरोधी गटांमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. स्वतंत्र निवडणूक लढवायची की आघाडी करायची, यावर अजूनही स्पष्ट भूमिका ठरलेली नाही. त्यामुळे विजयाचे गणित सोडाच, पण निवडणुकीला सामोरे जाण्याची दिशा ठरवणे हेच मोठे आव्हान विरोधकांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून २ जानेवारी ही अर्ज माघारीची शेवटची तारीख असेल. १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. म्हणजेच प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवसांचा अवधी उपलब्ध राहणार आहे.
हेही वाचा –Municipal Election: महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट; आज जाहीर होणार वेळापत्रक?
भाजप आघाडीत इतर पक्षांची कोंडी?
गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर ‘इन्कमिंग’ करत भाजपने सर्व महापालिकांत स्वबळावर लढण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. मात्र, युतीतील भागीदार असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ठोस शब्द न देता भाजपने सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. एकीकडे महायुती कायम असल्याचे संकेत दिले जात असताना, दुसरीकडे त्याच युतीतील समतोल बिघडवणाऱ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यातील भाजपचे इनकमिंग हे त्याचेच उदाहरण मानले जात आहे. मर्यादित वेळेच्या चौकटीत भाजपने आपल्या सहकारी पक्षांवर दबाव निर्माण केला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
शिवसेना (शिंदे गट) प्रत्येक महापालिकेत भाजपनंतर सर्वाधिक जागांचा दावा करत आक्रमक वाटाघाटी करत आहे. त्याउलट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना अपेक्षित संधी मिळत नसल्याची भावना आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या अजित पवार यांच्या प्रभावक्षेत्रांवर पकड मजबूत ठेवण्यावरच राष्ट्रवादीने भर दिल्याचे संकेत मिळत आहेत. ‘जे हातात आहे ते सोडून अनिश्चिततेकडे धाव घेण्यात अर्थ नाही,’ असा सूर पक्षातून उमटत असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीबाबतही चित्र धूसर
महाविकास आघाडीबाबतही चित्र धूसरच आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात कोणत्या महापालिकांत एकत्र लढायचे आणि कुठे स्वतंत्र, यावर अजूनही एकमत झालेले नाही. त्यातच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संभाव्य युतीबाबतही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत विजय मिळवणे दूरच, पण निवडणूक रणांगणात उतरायचे कसे, याचेच कोडे अनेक पक्षांसमोर उभे राहिले आहे.


