Women Cricketers’ Salary Hike: भारतीय महिला क्रिकेटच्या प्रगतीला नवी दिशा देणारा आणि महिला खेळाडूंना आर्थिक स्थैर्य देणारा एक मोठा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सर्वोच्च समितीने घेतला आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याच्या दिशेने पाऊल टाकत, बीसीसीआयने देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात दुप्पट पेक्षा जास्त (अडीचपट) वाढ केली आहे. सोमवार, २२ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नुकतेच बीसीसीआयचे प्रमुख म्हणून निवड झालेले मिथुन मन्हास यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने हा निर्णय घेतला असून, माजी सचिव आणि सध्याचे आयसीसी अध्यक्ष जय शहा यांचा महिला क्रिकेटच्या विकासाचा दृष्टिकोन पुढे नेला आहे.
BCCI घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील महिला क्रिकेटपटूंना ख्रिसमसची एक मोठी भेट मिळाली आहे. बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात थोडीथोडकी नाही, तर दुप्पट वाढ केली आहे. देशातील महिला क्रिकेटच्या वाढीसाठी आणि महिला क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थैरयासाठी हा निर्णय खूप महत्व राखून असेल. चार वर्षांनी ही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये महिलांच्या मानधनात १२ हजार ५०० रुपयांवरुन २० हजार इतकी करण्यात आली होती.
अशी असेल वाढ
महिलांच्या मानधनात वाढ करण्यचा प्रस्तावित बदल सोमवार, २२ डिसेंबर रोजी सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आले. देशांतर्गत महिला खेळाडूंना आतापर्यंत मिळत असलेल्या मानधनाच्या अडीचपट अधिक रक्कम मिळणार आहे. या सुधारणेमुळे महिलांच्या आर्थिक व्यवहार्यतेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. यापूर्वी, वरिष्ठ महिला खेळाडूंना प्रति दिवस २०,००० रुपये मानधन दिले जात होते, जे आता वाढवून प्रति दिवस ५०,००० रुपये करण्यात आले आहे. हा वाढीव दर संघातील अंतिम अकरा खेळाडूंना (playing eleven)लागू होईल.
तथापि, या नवीन रचनेचा फायदा केवळ प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंनाच होणार नाही. तर, राखीव म्हणून निवडलेल्या संघातील सदस्यांच्या मानधनातही लक्षणीय वाढ होणार आहे. वरिष्ठ राखीव खेळाडूसाठी दैनंदिन भत्ता सध्याच्या १०,००० रुपयांवरून २५,००० रुपये प्रति दिवस करण्यात आला आहे, ज्यामुळे संपूर्ण संघाला अधिक चांगली आर्थिक सुरक्षा मिळेल.
सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये वाढ
मानधन वाढीचा निर्णय सर्वप्रकारच्या क्रिकेट पद्धतीत घेण्यात आला आहे. आता राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना २५ हजार रुपये, तर राखीव खेळाडूंना १२ हजार ५०० रुपये इतके मानधन मिळेल. कुमारी गटातील मुलींना आता १० हजार आणि पाच हजार रुपयांऐवजी आता प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना २५ आणि राखीव खेळाडूंना १२ हजार ५०० रुपये मानधन मिळेल. ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी हीच वाढ १२ हजार पाचशे आणि ६ हजार २५० इतकी राहणार आहे.
बीसीसीआयची वचनबद्धता
बीसीसीआयचे प्रमुख म्हणून नुकतेच निवड झालेले मिथुन मन्हास यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाने महिला क्रिकेटच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवले आहे. जय शहा यांनी महिला क्रिकेटच्या वाढीचा ठेवलेला दृष्टिकोन या मंडळाने देखिल पुढे नेला आहे. नवीनतम वेतनवाढीमुळे देशातील महिला क्रिकेटपटूंसाठी अधिक मजबूत आणि शाश्वत परिसंस्था निर्माण करण्याच्या मंडळाची दीर्घकालीन वचनबद्धता स्पष्ट होते.
पंच, सामना अधिकाऱ्यांनाही वाढ
बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यातील पंच आणि सामना निरीक्षकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेऊन त्यांना देखिल प्रोत्साहित केले आहे. नव्या निर्णयानुसार पंच आणि सामना निरीक्षकांना आता ४० हजार रुपये मानधन करण्यात आले आहे. बाद फेरीसाठी त्यांचे मानधन ५० ते ६० हजार रुपये इतके असेल. रणजी चषक स्पर्धेत साखळी सामन्यासाठी पंचांना प्रत्येक सामन्यासाठी १.६० लाख, तर बाद फेरीसाठी अडीच लाख रुपये इतके मानधन मिळणार आहे.


