सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बहिणीच्या प्रेमविवाहाला विरोध केल्याच्या रागातून मेहुण्याने भाऊजीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पांगरी परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील क्षीरसागर आणि रेश्मा यांचा सुमारे एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र रेश्माचा भाऊ ऋषिकेश क्षीरसागर यासह कुटुंबातील काही सदस्यांना हे लग्न मान्य नव्हते. सुशील आणि रेश्मा कामानिमित्त पुण्यात राहत होते. २३ जानेवारी रोजी कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते येरमाळा येथे आले होते.
बुधवारी (२८ जानेवारी) सायंकाळी साडेआठच्या सुमारास कुटुंबीयांसह जेवणासाठी बार्शीतील एका हॉटेलमध्ये गेले असता, सुशील आणि ऋषिकेश यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले आणि ऋषिकेशने सुशीलच्या डोक्यात बाटली फोडून मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सुशीलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी ऋषिकेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप फरार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.


