Jayant Patil On Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता या घटनेच्या स्वरूपावर राजकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या अपघाताच्या पद्धतीवर संशय व्यक्त केला असून, “विमान हवेत गरगर फिरून खाली कोसळणे अनाकलनीय आहे,” असं म्हटलं आहे.
‘ब्लॅक बॉक्स’मधूनच सत्य बाहेर येईल – जयंत पाटील
बारामती विमानतळावर झालेल्या त्या भीषण दुर्घटनेबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, मी माझ्या आयुष्यात अनेक विमान अपघात पाहिले किंवा वाचले आहेत. सहसा विमान धावपट्टीला धडकते किंवा तांत्रिक बिघाडामुळे कोसळते. मात्र, अजितदादांचे विमान हवेतच गरगर फिरून जमिनीवर आदळणे हे धक्कादायक आहे. मी या विषयातला तज्ज्ञ नाही, पण हा प्रकार संशयास्पद वाटतो. आता ‘ब्लॅक बॉक्स’मधील रेकॉर्डिंग आणि वैमानिकाचे शेवटचे शब्द समोर आल्यावरच यामागचे खरे सत्य उघड होईल.’ यापूर्वी ममता बॅनर्जी यांनीही यात घातपाताची शक्यता वर्तवली होती, मात्र शरद पवारांनी त्याचे राजकारण न करण्याचे आवाहन केले होते.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा अध्याय संपला?
अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला होता. खुद्द शरद पवारांनीही कबूल केले की, अजित आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती आणि १२ तारखेला एकत्रीकरणाची घोषणा होणार होती. मात्र, दादांच्या निधनानंतर समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अजितदादांच्या अस्थी विसर्जनानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांनी घेतलेला उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय आणि शरद पवारांची ‘मला काहीच माहित नाही’ ही भूमिका पाहता, आता विलीनीकरणाच्या आशा मावळल्याचे चित्र आहे.
सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा
मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असून सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या मार्गातील सर्व कायदेशीर अडथळे दूर केले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे. काही वेळातच त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.


