Parbhani Mayor: राज्याच्या राजकारणात ‘मराठी कार्ड’ आणि प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा राबवणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने परभणीत मात्र एक वेगळी आणि सर्वसमावेशक रणनीती आखली आहे. परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी सय्यद इकबाल खाजा यांची निवड करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या राजकीय समीकरणांची नांदी दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साबिर शेख यांना मंत्रीपद देऊन दिलेल्या सामाजिक समतोलाच्या संदेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
संख्याबळाचे गणित आणि ‘इनसाईड स्टोरी’
परभणी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 34 नगरसेवकांच्या बहुमताची गरज होती. शिवसेना आणि काँग्रेसच्या आघाडीने एकत्रित येत 37 सदस्यांचे भक्कम पाठबळ उभे केले. विशेष म्हणजे, या युतीला एका अपक्ष नगरसेवकासह चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका नगरसेवकानेही पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाचा मार्ग अधिक सुकर झाला. शिवसेना आणि काँग्रेसमधील उत्तम समन्वयामुळेच ही निवड बिनधोक पार पडली.
नगरसेवकांची आकडेवारी आणि मुस्लिम प्रभाव
महापालिकेत ठाकरे गटाचे एकूण 25 नगरसेवक असून, त्यामध्ये 13 मुस्लिम आणि 12 हिंदू सदस्यांचा समावेश आहे. एकूण सभागृहात मुस्लिम नगरसेवकांची संख्या 30 इतकी मोठी असल्याने, लोकशाही मूल्यांचा आदर करत उद्धव ठाकरेंनी अल्पसंख्याक समुदायाला नेतृत्वाची संधी दिली. मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम प्रतिनिधींना डावलण्याऐवजी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे धोरण पक्षाने येथे स्वीकारले आहे.
भाजपची माघार
सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनेही सुरुवातीला पडद्यामागून जोरदार हालचाली केल्या होत्या. मात्र, आवश्यक असलेले 34 हे मॅजिक फिगर गाठणे भाजपला अशक्य असल्याचे स्पष्ट झाले. पुरेसे संख्याबळ नसल्याचे लक्षात येताच भाजपने स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकृत प्रक्रियेत सय्यद इकबाल खाजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
साबिर शेख यांच्या आठवणींना उजाळा
शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयाची तुलना 1995 च्या युती सरकारशी केली जात आहे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी साबिर शेख यांना कॅबिनेट मंत्री करत ‘शिवसेना ही केवळ एका धर्मापुरती मर्यादित नाही’ असा संदेश दिला होता. तोच वारसा आता परभणीत जपला जात असून, या निवडीमुळे अल्पसंख्याक समाजात ठाकरे गटाची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. परभणीकरांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. चंद्रपूरमधील राजकीय उलथापालथीनंतर आम्ही अत्यंत सावध होतो, अशी प्रतिक्रिया खासदार बंडू जाधव यांनी दिली. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील समन्वय हा या विजयाचा पाया असल्याचेही त्यांनी नमूद केले.


