BMC News : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 नंतर आता मोठा न्यायालयीन वाद समोर आला आहे. तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
RTI मधून धक्कादायक माहिती उघड
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मुंबई महापालिकेच्या विधी विभागाकडून ही माहिती मिळवली. निवडणुकीनंतर विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची माहिती त्यांनी मागवली होती.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट असून काहींवर सुनावणी सुरू आहे.
एका याचिकेवर कोर्टाचा निर्णय
प्रभाग 119 ‘एस’ मधील मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक राजेश सोनावळे आणि इतर उमेदवारांविरोधात दाखल केलेली याचिका लघुन्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र उर्वरित प्रकरणांमध्ये अद्याप सुनावणी सुरू असल्याचे समोर आले आहे.
विविध पक्षांच्या नगरसेवकांना आव्हान
या याचिकांमध्ये भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, मनसे, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे. ‘एच/पूर्व’, ‘के/पूर्व’, ‘एम/पूर्व’, ‘एस’, ‘आर/उत्तर’, ‘पी/दक्षिण’ आणि ‘जी/उत्तर’सारख्या महत्त्वाच्या प्रभागांतील निवडून आलेल्या सदस्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे.
कशावरून दाखल झाल्या याचिका?
सूत्रांच्या माहितीनुसार, मतमोजणीतील त्रुटी, उमेदवारी अर्जांवरील वाद, निवडणूक नियमांचे उल्लंघन आणि कथित गैरप्रकार या मुद्द्यांवरून या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता
इतक्या मोठ्या संख्येने निवडणूक याचिका दाखल झाल्याने आगामी काळात न्यायालयीन निर्णयांचा मुंबई महापालिकेच्या सत्तासमीकरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष न्यायालयीन सुनावण्यांकडे लागले आहे.
मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष
2026 च्या निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला 65, शिंदे गटाला 29, काँग्रेसला 24, एमआयएमला 8 आणि मनसेला 6 जागा मिळाल्या. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठे बदल झाल्याचे चित्र दिसून आले.


