वसई : अज्ञात कंटेनर कळंबच्या समुद्रकिनारी वाहून आल्याचे दिसल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून हा कंटेनर मालवाहू जहाजातून पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. वसईच्या कळंब या प्रचंड गर्दी असलेल्या सागरी किनाऱ्यावर मंगळवारी सकाळी एक भला मोठा लोखंडी कंटेनर दिसून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि कोस्टल विभागाने कळंबच्या किनारी धाव घेऊन कंटेनरची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्राला भरती असल्यामुळे त्यांना वाट पाहावी लागली. भरती ओसरल्यावर कंटेनरला बाहेर आणून त्याची तपासणी केली जाईल. त्यानंतरच त्याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी याच किनारी मेन कियाट नावाचे भले मोठे जहाज भरकटत वाहून आले होते. या जहाजात टीव्ही, फ्रीज अशा महागड्या वस्तू असलेली तीन मजली इमारत होती. ते स्क्रॅप करण्यासाठी गुजरातला नेत असताना भरकटत कळंबच्या किनारी लागले होते. त्यावेळी बॉम्बस्फोटाच्या आणि समुद्रामार्गे अतिरेकी भारतात येण्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे या कंटेनरच्या घटनेने येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते.


