नागपूर : राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वात नागपूर येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून ओबीसी समाजाने सरकारला इशारा दिला असून 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकरांची आहे. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनीही मोर्चातील भाषणातून सरकारला इशारा दिला आहे. येथे ओबीसींच्या आजच्या ऐतिहासिक मोर्चा मध्ये 371 जाती आहेत, आणि दुसरीकडे मराठा एक जात आहे. जे 56 टक्के त्यांना 27 आरक्षण आणि 15 टक्के लोकांना 48 टक्के आरक्षण ही चाणक्यनिती आहे. राज्यातील 15 टक्क्याचं सरकार हे तुमच्यात भांडण लावण्याचं काम करत आहे. 2 सप्टेंबर रोजी काढलेला जीआर वाचल्यावर एका जरांगेच्या भरवश्यावर तुम्ही निवडून आलात काय? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.
आमदारकी गेली खड्ड्यात वड्डेटीवार कसलीही परवा करणार नाही. राजकारणापलिकडे जाऊन जो कोणी आपला घात करेल, त्याचा घात करण्याची तयारी ठेवा. सरकारने 2 सप्टेंबरचा जीआर रद्द न केल्यास पुणे-मुंबई जाम करू, असा इशाराही सरकारला दिला. माझा डीएनए ओबीसी आहे, तुमचा ओबीसी असेल तर ओबीसींच्या गळ्यावर सुरी का फिरवत आहात. सुधारून जा नाहीतर तुमची जागा दाखवणार, असा इशाराच सरकारला दिला आहे. आमदारकी खड्ड्यात गेली, आमच्यावर अन्याय होत असेल तर वड्डेटीवार कसली परवा करणार नाही. सरकारने 2 सप्टेंबरचा जीआर रद्द न केल्यास त्यांनी केवळ मुंबईत मोर्चा काढला, आम्ही मुंबई पुण्यासह ठाणेही जाम करू, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकारला दिला आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळत असेल तर आमचा विरोध नाही, कोणत्याही परिस्थितीत हा जीआर रद्द व्हावा अशी आमची मागणी आहे. हा मोर्चा फक्त झाकी आहे, काहीही झालं तरी ओबीसीमधील घुसखोरी थांबवू, सरकार थांबवत नसेल तर सरकारला थांबवू, असा इशाराही वडेट्टीवारांनी महायुती सरकारला दिला. धनगर समाजात फूट पाडली, ओबीसीमध्ये फूट पाडली, ही पाळी आज आपल्यावर आणली. आरक्षण नको हीच ह्यांची विचारधारा आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.


