मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध ‘दबंग’चे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांच्या मागील मुलाखतींची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. कश्यप यांनी सलमानच्या अभिनयापासून ते त्याच्या वर्तनापर्यंत सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सर्व घडामोडीनंतर सलमान खानने ‘दबंग’च्या दिग्दर्शकाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला.
शुक्रवारी मुंबईतील न्यायालयाने चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांचा भाऊ अभिनव कश्यप यांना सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध कोणत्याही प्रकारची अवमानकारक किंवा अपमानजनक टिप्पण्या करण्यापासून किंवा नकारात्मकता पसरवण्यापासून रोखले आहे. सलमानने न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे आणि हा मनाई आदेश कायमचा असावा, अशी त्यांची इच्छा आहे. सलमान खानने कश्यपकडून 9 कोटी नुकसानभरपाईची मागणी देखील केली आहे. तसेच, बिनशर्त माफी मागावी, असेही म्हटले आहे.
अभिनव कश्यपने सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान सलमानविरुद्ध २६ व्हिडिओ मुलाखती आणि पॉडकास्ट प्रसिद्ध केले. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, या व्हिडिओंमध्ये दिग्दर्शकाने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद, खोटे आणि अत्यंत बदनामीकारक विधाने केली आहेत. याचिकेत खुशबू हजारे आणि अनेक प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नावही घेतले आहे.


