Cabinet Decision: नव्या आर्थिक वर्षाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ६ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिंचन, पर्यावरण आणि सामाजिक कल्याणावर भर देण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
१. दुष्काळी भागाला दिलासा: साकळाई योजनेसाठी १,२३४ कोटी
अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासाठी सरकारने मोठी तरतूद केली आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेला १,२३४ कोटी रुपयांची मान्यता मिळाल्याने ३२ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. यामुळे सुमारे ९,६०० हेक्टर शेती ओलिताखाली येईल.
२. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ५४ अतिप्रदूषित नदी पट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी हे प्राधिकरण युद्धपातळीवर काम करणार आहे.
३. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत १२ वर्षांनंतर वाढ
राज्यातील आठवी ते बारावीच्या हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला. तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत सरकारने भरीव वाढ केली असून, यामुळे त्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळणार आहे.
४. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट
भूमि अभिलेख विभागात आता ‘भूकरमापक’ हे पद ‘परिरक्षण भूमापक’ म्हणून ओळखले जाईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीचे मार्ग मोकळे झाले असून, विभागीय भरतीद्वारे हे पदे भरली जातील.
५. आरक्षण उपवर्गीकरणासाठी उच्चस्तरीय समिती
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात आलेल्या विविध निवेदनांचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती नेमण्याचा निर्णय बैठकीत झाला.
६. अमरावतीत खेळाडूंना मिळणार मोठे मैदान
अमरावती महापालिका क्षेत्रातील मौजे नवसारी येथील १६,७०८ चौ.मी. जागा क्रीडा संकुल उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल विभागाने या जागेचा ताबा क्रीडा विभागाकडे देण्याचे आदेश दिले आहेत.


