हिंगोली: महाराष्ट्रात महायुतीच्या राजकारणात ताण-तणाव वाढत असताना, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार संतोष बांगर यांनी याबाबत घोषणा करताना सांगितले की, हिंगोलीत आम्ही स्वबळावर उमेदवार उभे करू. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी तयारीला सुरुवात झाली असल्याचंही बांगर यांनी स्पष्ट केलं.
बांगर यांनी स्पष्ट केले की, जिथे युती शक्य आहे, तिथे आम्ही सहकार्याचा विचार करू. पण जिथे मतभेद आहेत, तिथे आमचा पक्ष स्वतंत्रपणे लढेल. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी सांगितले की, कोणावरही वैयक्तिक टीका न करता आपल्या कामाच्या बळावर मतदारांचा विश्वास जिंकावा. आपली ताकद दाखवायची असेल तर विकासकामांमधून दाखवा, असे आवाहन यावेळी संतोष बांगर यांनी केलं आहे.
हेही वाचा – ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार; संजय राऊत यांची मोठी घोषणा
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा–भडगाव मतदारसंघात शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युती आधीच विस्कटली आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर लढणार अशी घोषणा केली, तर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला. या हालचालींमुळे महायुतीत अंतर्गत मतभेद उघड होत असून, आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


