Karnataka Road Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरू असतानाच, शेजारच्या कर्नाटकातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यादगीर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि कारमध्ये झालेल्या भीषण धडकेनंतर बसने पेट घेतला. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ६ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. देवदर्शन आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
कसा घडला हा थरार?
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून कलबुर्गीच्या दिशेने एक खासगी आरामबस भरधाव वेगाने जात होती. शांतगिरी क्रॉस जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, क्षणार्धात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
प्राण वाचवण्यासाठी प्रवाशांची आर्त हाक
बसने पेट घेताच आतमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी खिडक्या आणि दरवाजातून बाहेर पडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अनेकांनी हाताला लागेल ते सामान घेऊन धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने ६ प्रवाशांना आगीच्या ज्वाळांमधून बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून अंत झाला. इतर काही प्रवासी देखील या दुर्घटनेत जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अग्निशमन दलाची धाव, पण सर्व काही खाक
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. यादगीरचे पोलीस अधीक्षक पृथ्वीक शंकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


