Jaipur Bus Fire: राजस्थानच्या जयपूरजवळ मनोहरपूर परिसरात गुरुवारी सकाळी भीषण बस अपघात घडला. वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी एक खाजगी बस हाय-टेन्शन वायरच्या संपर्कात आल्याने क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर भाजले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वीजेच्या संपर्कात आल्याने बस पेटली
घटनेची प्राथमिक माहिती अशी की, शाहपुरातील तोडी गावातील वीटभट्टीवर काम करणारे कामगार या बसने प्रवास करत होते. जयपूरपासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मनोहरपूर परिसरात बस हाय-टेन्शन लाईनला स्पर्श झाली आणि क्षणात वीज प्रवाह बसमध्ये पसरला. काही क्षणांत बसला आग लागली. परिस्थिती अधिक भयानक झाली कारण बसमध्ये ५ ते ६ गॅस सिलिंडर साठवलेले होते, जे स्फोटक ठरले.
मृतांमध्ये वडील-मुलीचा समावेश
या दुर्घटनेत मृत पावलेल्यांमध्ये ५० वर्षीय नसीम आणि त्यांची २० वर्षीय मुलगी शाहीन यांचा समावेश आहे. तिसऱ्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना जयपूर आणि मनोहरपूर येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून तत्काळ मदत; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे निर्देश
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘जयपूरमधील मनोहरपूर येथे झालेल्या बस अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.’ तथापी, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, तपासासाठी तज्ज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.


