Sharad Pawar: महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली असून, आज त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा उल्लेख केला आहे.
राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री
आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळण्याचा मान मिळणार आहे. शपथविधीपूर्वी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली असून, यामध्ये सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी अधिकृत निवड केली जाईल. या सोहळ्यासाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत.
‘आज अजित असते तर फिल्डवर दिसले असते’ – शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘अजित हा तळागाळातील लोकांशी नाळ जोडलेला कर्तृत्वान नेता होता. पहाटेपासून कामाला सुरुवात करणं हा त्याचा शिरस्ता होता. आज जर तो हयात असता, तर नक्कीच घरात बसून राहिला नसता, तर जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानावर राबताना दिसला असता.’
पक्षाच्या विलीनीकरणाचे संकेत?
शरद पवारांनी यावेळी एक खळबळजनक खुलासाही केला. गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती, ज्याचे नेतृत्व स्वतः अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. पवार म्हणाले की, ‘१२ तारखेला दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा निर्णय जाहीर करण्याचे अजितदादांनीच निश्चित केले होते. दुर्दैवाने त्यापूर्वीच ही घटना घडली. अजितची जी इच्छा होती, ती पूर्ण व्हावी अशी आमचीही इच्छा आहे.’ यामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकसंध होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शपथविधीवर शरद पवारांची भूमिका
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत विचारले असता, पवारांनी स्पष्ट केले की हा सर्वस्वी त्यांच्या (अजित पवार गट) पक्षाचा निर्णय आहे. ‘पक्ष त्यांचा आहे आणि त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. कौटुंबिक नाते आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत,’ असे सांगत त्यांनी या प्रक्रियेवर अधिक भाष्य करणे टाळले.


