Girish Mahajan : मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या शेजारी झालेल्या या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून अजित पवार यांच्या निधनावर अजूनही अनेकांना विश्वास बसत नाहीये. या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर सुरू असलेल्या विधींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
या चर्चांदरम्यान, शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार थेट मुंबईत दाखल झाल्या. आज सायंकाळी 5 वाजता पक्षाची बैठक होणार असून त्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. जो निर्णय तुम्ही घ्याल, तो आम्हाला मान्य आहे, असे मुख्यमंत्री यांनी कालच स्पष्ट केले आहे. आम्हाला कोणतीही अडचण नाही.”
शपथविधीबाबत घाई होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना महाजन म्हणाले, “घाई होते आहे की नाही, यावर मी काय बोलणार? त्यांची काहीतरी अडचण किंवा काही तांत्रिक कारण, कदाचित एखादी रणनीती असेल, म्हणून दुसऱ्याच दिवशी निर्णय घेतला असावा.”
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांवर गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हा आमचा विषय नाही. त्या एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच आहे. कुठलीही अडचण नाही. सुनेत्रा वाहिनी आणि त्यांनीच ठरवावे काय करायचे,” असे ते म्हणाले.
तसेच, “एकत्र येण्याबाबत काही असत तर त्यांनी आम्हाला बोलावलं असत. सध्या धावपळीत छोटे कार्यक्रम आहेत. सर्वांनाच बोलावले नाही. मी मात्र जाणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा न झाल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


