पुणे: राज्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला होता. या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. जनावरे, घरे वाहून गेली. सगळं आयुष्य उद्ध्वस्थ झालं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे केले. सरकारने 2215 कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. मात्र, शेतकऱ्यांना ही मदत कुठपर्यंत पुरणार असा प्रश्न आहे.
त्यातच, मे महिन्यात मिळालेल्या मदतीनंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मे महिन्यात अतिवृष्टीने (Flood) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्या शेतकऱ्याचं पावणे दोन लाखांचं नुकसान झाल होतं. पण सरकारकडून त्यांस केवळ 2550 रुपये मदत मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्याचे जवळपास पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्यानंतर तब्बल अडीच हजार नुकसान भरपाई आल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. आता, हेच पैसे आम्ही कृषीमंत्र्यांना देणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील सुमित निंबाळकर यांना ही मदत आली असून इतर शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील बुहतांश जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटात सापडेल्या शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.
मात्र, मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत मिळण्यास सुरुवात झाली असून मिळणारी मदत अत्यंत तोडकी असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मे आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. जर आम्हाला मदत करायची असेल तर भरीव स्वरूपाची करा, अन्यथा शेतकऱ्यांची थट्टा करू नका, अशी भावना संतप्त शेतकऱ्यांची आहे. जरी आम्हाला मदत आली तरी आम्ही ती मदत सरकारला परत देऊ, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय.


