बीड: बीडच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका करत ‘विखे आला आणि महाराष्ट्रभर विखार पसरवून गेला’ असा हल्ला चढवला होता. यावर आता स्वतः विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाचा प्रश्न सोडवला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
भुजबळांनी विखेंवर मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना विखे म्हणाले, मी नेहमीच भुजबळांचा आदर करत आलो आहे. सार्वजनिक जीवनात कधीच ओबीसी आणि मराठा समाजात दरी वाटली नाही. आज महाराष्ट्रातील लोक एकत्र दिवाळी साजरी करत आहेत. ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं कधी झालंय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, आमच्या डीएनएमध्येच ओबीसी आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. मी लवकरच भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणार आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्यासह भेट घेऊन संपूर्ण प्रक्रिया त्यांना समजावून सांगू.
दरम्यान, विखे पाटलांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. राज्य सरकारने 32 हजार कोटींचं मदत पॅकेज जाहीर केल्यानंतरही पवारांच्या राष्ट्रवादीने काळी दिवाळी साजरी केली. लोकांनी आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं थांबवलं आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते आंदोलनाचा आधार घेत आहेत, असा टोला विखे पाटलांनी लगावला.
विखे पाटील यांनी सांगितलं की, दिवाळीनंतर ते सर्व ओबीसी नेत्यांना बोलावून न्यायमूर्ती शिंदे यांच्या उपस्थितीत विषयावर चर्चा करतील. मनोज जरांगे यांनी प्रामाणिकपणे आंदोलन केलं आहे; पण समाजात फूट पाडणं चुकीचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.


