सध्या गुळाच्या तुलनेने साखरेचा वापर जास्त केला जातो. पण असे जरी असले तरी गूळ की साखर आरोग्यासाठी काय चांगले हे अनेकांना माहिती नसते. गूळ खाणारे त्याचे आरोग्य फायदे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, तर साखर खाणारे त्याचे हानिकारक परिणाम माहिती असूनही ते खाताना दिसतात.
गूळ बहुतेकदा हेल्दी साखर म्हणून विकली जाते आणि बरेच लोक ते पांढऱ्या साखरेऐवजी वापरतात. मात्र, तुम्ही पांढरी साखर, तपकिरी साखर, सेंद्रिय साखर किंवा गूळ खाल्ला तरी तुमच्या शरीराला कोणताही फरक जाणवणार नाही. तुमचे यकृत या सर्व प्रकारच्या साखरेचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सारखीच वाढते. जर तुम्ही नैसर्गिक खजूर गूळाचे समान प्रमाणात सेवन केले तर ते रिफाइंड पांढऱ्या साखरेपेक्षा थोडे चांगले आहे. कारण खजूर गूळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजेच ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते आणि तुमची ऊर्जा पातळी स्थिर ठेवते.
हे पर्यावरणपूरक देखील आहे. कारण खजूर झाडांना उसापेक्षा कमी पाणी आणि जमीन लागते. त्यात काही अतिरिक्त सूक्ष्म पोषक घटक देखील असतात. गूळ हा स्वादिष्ट, पारंपारिक आणि पांढऱ्या साखरेपेक्षा थोडा चांगला आहे, परंतु तरीही तो साखर आहे. तो कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.


