जालना: अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने ३२ हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा होण्यासही सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भव्य आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात डिकसळ येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला १५ दिवसांची मुदत दिली आहे. शेती नुकसानीचा पंचनामा आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही नोकरभरती करू नका, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. आम्ही स्वतः शेतकऱ्यांची लेकरं आहोत. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतीच्या नुकसानीकडे सरकारने दुर्लक्ष करता कामा नये. सरकारला आम्ही १५ दिवसांचा वेळ देतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर लढा उभारू, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तथापी, जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी बैठकांचे आयोजन दिवाळीनंतर करण्यात येईल. गेल्या शंभर वर्षांत कोणीही असं आंदोलन केलं नाही, तसं आंदोलन शेतकऱ्यांसाठी उभं करू, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी यावेळी माध्यमांसमोर मांडली.
दरम्यान, २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रासंबंधी शासन आदेश जारी केला. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजातील कुणबी वर्गाला ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत सांगितलं, त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. आता त्यांनी दिलेला शब्दही पाळावा, ही आमची विनंती आहे. फक्त शेतात फेरफटका मारून किंवा भाषणं देऊन शेतकऱ्यांचा संसार सावरणार नाही. शेतकऱ्यांना खरी मदत मिळवण्यासाठी ताकदीने आंदोलन उभारावं लागेल. मुंडक्यावर पाय द्यावा लागेल, तेव्हाच सरकार जागं होईल, असंही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.


