Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी परत कराव्या असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. मला खडसेंना काही त्रास द्यायचा नाही. त्यांची तब्येत सध्या खराब आहे, त्यांची मानसिक स्थिती खराब आहे. लोकांना खोटी प्रलोभने देऊन त्यांनी कमी किंमतीत जमिनी खरेदी केल्या होत्या. आता त्या जमिनी परत केल्या पाहिजेत असे महाजन म्हणाले.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
मानपुर येथील साखर कारखाना कंपनीत त्यांनी मला सुद्धा डायरेक्टर म्हणून घेतले होते. लोकांना खोटी प्रलोभने देऊन त्यांनी कमी किमतीत जमिनी खरेदी केल्या. आता त्या जमिनी परत केल्या पाहिजेत. माझ्या नावावर सुद्धा सहा एकर जमीन घेतली होती. ही जमीन महार वतनाची असल्याचे समजल्यानंतर आठ वर्षांपूर्वी मी ही जमीन परत केली आहे. एकनाथ खडसे हे गेंड्याच्या कातडीचे आहेत, त्यांना ती जमीन परत करायचीच नाही. भोसरी जमीन प्रकरण, महामार्ग जमीन घोटाळा अशा प्रकारचे सहा-सात गुन्हे त्यांच्याविरुद्ध दाखल झाले आहेत. एकनाथ खडसेंनी नैतिकतेच्या गप्पा करू नयेत. तुमच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा असे महाजन म्हणाले.
जळगाव जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. केळी, मका द्राक्ष यासह फळबागांचे मोठे नुकसान आहे. शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल असे महाजन म्हणाले. संजय राऊत यांचे स्वागत आहे, त्यांचे स्वागत करायला मिळाले असते तर मला आनंद झाला असता. मात्र मला नाशिक येथे निघायचे आहे असे महाजन म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी तक्रार करावी, कुठे डायरेक्टर आहे कुठे मी पैसे लपवले आहेत, त्यांनी माझी तक्रार करावी असे महाजन म्हणाले. तुमची प्रत्येक आठवड्याला एसआरडी चौकशी होते, गुन्हे दाखल होत आहेत, ते तुम्ही बघा. लोकांच्या जमीनी खाऊन चालले महार वतनाच्या जमिनी खाऊन चालले, हायवेमध्ये जमिनी घेतात त्यांचे कार्यकर्ते लगेच झाडे लावतात. सात ते आठ गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत. 136 कोटी रुपयांचा रॉयल्टी मध्ये तुम्हाला दंड झालेला आहे अशी टीका महाजन यांनी राऊत यांच्यावर केली. आपण आपलं बघा, माझ्याविषयी काही शंका असेल तर तुम्ही तक्रार करा असे महाजन म्हणाले.
मला जसं कळालं ते जमीन महार वतनाची आहे, ती जमीन लगेच परत केली. खरेदीचे देखील पैसे घेतले नाहीत, जे घेतले होते ते सुद्धा पैसे त्यांना परत दिल्याचे महाजन म्हणाले. तुम्ही जी जमीन मुलीच्या नावावर घेतली ती का तुम्ही परत करत नाही? असा सवाल महाजन यांनी केला. आपल्या एवढ्या बातम्या येत आहेत ती म्हातारी जमिनीसाठी चकरा मारत आहे. मात्र, तुम्हाला थोडेफार काही वाटते आहे का? असा सवाल महाजन यांनी केला.


