Mahabaleshwar Accident: निसर्गरम्य महाबळेश्वरच्या डोंगररांगांमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आंबेनळी घाटातील सुमारे ९०० फूट खोल दरीत कोसळून एका दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला. महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ आणि पोलादपूरच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अंधार अशा प्रतिकूल परिस्थितीत सलग दोन दिवस चाललेल्या थरारक शोधमोहिमेनंतर आज दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
संशयास्पद दुचाकीमुळे घटना उघडकीस
आंबेनळी घाटात रस्त्याच्या कडेला एक दुचाकी बेवारस स्थितीत उभी असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. बराच वेळ दुचाकी तिथेच असल्याने प्रशासनाला संशय आला आणि तात्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली. स्थानिक बचाव पथकांनी दोराच्या साहाय्याने जीवाची पर्वा न करता ९०० फूट खोल दरीत धाडसी शिरकाव केला.
अथक प्रयत्नांनंतर मृतदेह सापडले
खोल दरीत उतरल्यानंतर काही तासांच्या प्रयत्नांनंतर पुरुषाचा मृतदेह हाती लागला. पुरुषाचा मृतदेह जिथे सापडला, तिथून आणखी १५० फूट खोलवर महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण अशी पटली असून, या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे.
बचावकार्यात निसर्गाचा अडथळा
काल रात्री मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे दृश्यमानता शून्य झाली होती, परिणामी बचावकार्य थांबवावे लागले होते. मात्र, आज पहाटेपासूनच पोलीस आणि स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने संयुक्त मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. प्रचंड उतार आणि निसरड्या दरडींमुळे मृतदेह वर काढताना बचाव पथकाची मोठी कसोटी लागली.
अपघात की घातपात? तर्क-वितर्कांना उधाण
रस्त्याच्या कडेला मोटारसायकल व्यवस्थित उभी असताना हे दाम्पत्य इतक्या खोल दरीत पडलेच कसे? हा निव्वळ अपघात आहे की यामागे काही वेगळे कारण आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. महाबळेश्वर पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील.


