UBT vs BJP : वरळी परिसरातील ‘सेंट रेजिस’ हॉटेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत तीव्र चकमक झाली. कामगार युनियनच्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सुटला. घटनेला सुरुवात झाली ती ठाकरे गटाच्या कामगार युनियनमधील काही सदस्यांनी भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघात प्रवेश केल्याने. या हालचालीचा निषेध करत भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि दोन्ही बाजूंतील कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. घोषणाबाजी आणि ढकलाढकलीच्या वातावरणात तणाव वाढत असतानाच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दोन्ही पक्षांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप
संघर्षानंतर दोन्ही पक्षांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव केला. ठाकरे गटातील कार्यकर्ते टिकत नाहीत, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात आली. तर मनमानी फोडाफोडीला आम्ही बिलकूल मान्यता देणार नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सेंट रेजिसमध्ये त्यांची युनियन आधीपासून अस्तित्वात असून नव्या सदस्यांशी संपर्क राखण्यासाठी आणि बोर्ड लावण्यासाठी ते आले होते. ‘आम्ही शांततेत काम करत होतो. ठाकरे गटातील काही जणांनीच विनाकारण गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. भाजपने कुठेही संघर्षाचा मार्ग स्वीकारलेला नाही,’ असे एका पदाधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा – ‘शिवसेना को हराना नामुमकिन है’; बदलापूरात एकनाथ शिंदेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची चेतावणी दिली. कामगारांना कोणत्याही युनियनमध्ये सामील होण्याचा संविधानिक अधिकार आहे. सर्वांनी एकमेकांना काम करण्याची मोकळीक द्यावी, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


