पुणे: मराठवाड्यातील चारदिवसीय दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज परभणीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही कोणतेही बटन दावा मत तर भाजपालाच जाणार.100 वर्षात मराठवाड्यावर असे कधीही संकट आले नाही. मतचोरीनंतर हे आता जमीन चोरी करत आहेत. आता जर कर्जमुक्ती केली नाही तर मग कधी करणार? जमीन खरडून गेली आहे, तरीही इकडे कोणी यायला तयार नाही. पूर्ण माती वाहून गेली. आता सरकारला मतचोरीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही, असा दावा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी ठाकरे यांनी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणावर देखील कठोर मत व्यक्त केले. तसेच कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले केंद्रीय पथक तुमच्या दारात आले की, नाही? परदेशी समिती आली की नाही? केंद्रीय समिती तुमच्याकडे येणार नाही. आता निवडणुका आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या हाताला पाने पुसण्यासाठी कोणते तरी पॅकेज आणतील. पंतप्रधानांचे सर्वात जास्त प्रेम बिहारवर आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनीचं सांगितलं आहे.
तथापी, शक्तीपीठ महामार्ग, सिमेंट कारखाना व नियमबदल यासारख्या इतर प्रश्नांवरही ठाकरेने सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना संयमाचे आणि आत्महत्यांबाबत खबरदारीचा संदेश दिला. आर्थिक संकटानंतर आत्महत्या करून प्रश्न सुटत नाही. काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच त्यांनी मतदानाबाबत आणि राजकीय दबावाबाबत देखील गंभीर इशारा दिला.


