मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २ डिसेंबरला होणाऱ्या या मतदानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कमर कसली असताना, वसई-विरारमध्ये राजकीय वारे वेगाने वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी इनकमिंग सुरू असून, बहुजन विकास आघाडी व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना मोठा धक्का बसला आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीला खिंडार पडले आहे. माजी नगरसेवक शकुंतला शेळके यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार स्नेहा दुबे यांच्या माध्यमातून शेळके यांनी भाजपची साथ दिली असून, त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाले आहेत. तसेच, शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपकडे वळले आहेत. या पक्षप्रवेशामुळे भाजपला आगामी निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून शकुंतला शेळके हे बहुजन विकास आघाडी सोडण्याच्या चर्चा होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात १०० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने गेल्या २० वर्षांत महानगरपालिका व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वर्चस्व राखले होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकांत बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला, यामध्ये हितेंद्र ठाकूर व त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर हे दोघेही पराभूत झाले.


