रत्नागिरी : रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात आज पहाटे सुमारे ५ वाजता खासगी ट्रॅव्हल्स बसचा भयानक अपघात झाला. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील या चक्री वळणावर बसचं नियंत्रण सुटलं आणि ती सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या साखरपा पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केलं. दरीत अडकलेल्या बसला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण बस पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. अपघाताचे नेमकं कारणं अजून स्पष्ट झालेले नाही, पण घाटातील तीक्ष्ण वळण आणि वेगावरून नियंत्रण सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनेचा सविस्तर तपास सुरू केला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावरील वाहतूक काळजीपूर्वक व्यवस्थापित करण्यात आली आहे.
या अपघाताने पुन्हा एकदा घाटमार्गावरील अपघातांची समस्या ऐरणीवर आली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अशा दुर्घटनांची मालिका सुरू असून, यवतमाळ, लातूरसारख्या ठिकाणीही जीवितहानी झाल्याने प्रवासी वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्रवाशांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत उपलब्ध करून दिली असून, जखमींच्या उपचारासाठी आवश्यक खर्चाची जबाबदारी घेतली आहे.


